Advertisement

Showing posts with label sanatan sanstha. Show all posts
Showing posts with label sanatan sanstha. Show all posts

Friday, July 23, 2010

धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर


सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी १९९७ साली घेतलेल्या `साधना आणि क्षात्रधर्म' या विषयांवरील १००हून अधिक जाहीर सभांचा काळ म्हणजे प.पू. डॉक्टरांची विविध रूपे पहाण्याचा, त्यांचा सहवास अनुभवण्याचा एक सुवर्णयोग होता. विविध घटनांतून अनुभवता आलेले प.पू. डॉक्टरांचे साधकांवरील निस्सीम प्रेम, साधकांची सेवा चुकांविरहित होण्यासाठीची त्यांची तळमळ, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांच्या प्रवचनामुळे भारावून कृतीसिद्ध होणारा समाज असे अनेकविध अनुभूतींचे भांडार या सभांच्या स्मरणात साठून राहिले आहे आज कालच्या लेखाचा पुढील भाग पाहू
संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
उत्तरार्ध

३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !
३ इ. साधकांच्या बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेणारे पितृतुल्य प.पू. डॉक्टर !
३ इ १. सभेच्या व्यासपिठाच्या साहित्याच्या टेम्पोसोबत ५-६ साधक नियमितपणे अनेक दिवस होते. या साधकांची प.पू. डॉक्टर आवर्जून विचारपूस करत. सभेच्या नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील स्थानिक साधकांना `व्यासपिठाच्या गाडीसोबत असणार्‍या साधकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था झाली आहे का', याविषयी विचारत.
३ इ २. प.पू. डॉक्टरांना अनेक साधक फळे, मिठाई देत. प.पू. डॉक्टर ही सर्व मिठाई आणि फळे गाडीसोबत असणार्‍या साधकांना भूक लागल्यावर काहीतरी खायला हवे; म्हणून देत असत.
३ इ ३. रत्‍नागिरी येथील सभा झाल्यानंतर पुढच्या सभेला दोन दिवसांचा अवधी होता. लागोपाठ सभा होत असल्यामुळे व्यासपिठाच्या सेवेतील साधकांना विश्रांती म्हणून प.पू. डॉक्टरांनी त्यांना गणपतीपुळयातील स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी आणि समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी पाठवले. यासाठी त्यांनी स्वत:ची गाडी साधकांना दिली.
३ इ ४. कारवार येथील मुक्कामात व्यासपिठाच्या सेवेतील एक साधक ताप आल्यामुळे गाडीत झोपला होता. बाकीचे साधक प.पू. डॉक्टरांसमवेत थोड्या अंतरावर उभे राहून बोलत होते. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी `गाडीत कोण झोपले आहे ?', `का ?', अशी चौकशी केली. आजारी असल्यामुळे साधक झोपल्याचे समजल्यावर ते तात्काळ गाडीकडे चालत गेले. त्यांनी त्या साधकाची चौकशी केली आणि पुढील सेवा थांबवून त्यांनी त्या साधकासाठी त्यांचा मुक्काम असलेल्या घरातून औषधे आणून दिली.
३ इ ५. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका हा एक अतीदुर्गम भाग. रहदारीच्या साधनांची न्यूनता असूनही देवगडच्या मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या गावातील साधक देवगड येथील सभेसाठी आले होते. ही सभा संपल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले. प.पू. डॉक्टरही त्याच मुख्य रस्त्यावरून पुढील सभेच्या ठिकाणी जात होते. रस्त्यात प.पू. डॉक्टरांना हे साधक दिसल्यानंतर त्यांनी स्वत:ची गाडी थांबवली आणि या सर्व साधकांना त्यांनी गाडीत घेतले. त्या सर्व साधकांना गाडीत बसता यावे, यासाठी प.पू. डॉक्टर स्वत: अत्यंत दाटीवाटीने गाडीत बसले. त्या साधकांना त्यांच्या गावानजीक सोडल्यानंतर प.पू. डॉक्टर पुढील प्रवासाला निघाले.
साधकांना जोडून ठेवण्यात किंबहुना सनातन हे विशाल कुटुंब होण्यास प्रेमभाव हे मुख्य सूत्र आहे. हा प्रेमभाव प.पू. डॉक्टरांनी साधकांना कसा शिकवला, हे स्पष्ट करणारी ही वरील उदाहरणे आहेत.
३ ई. साधकांच्या सेवा त्रुटीविरहित व्हाव्यात, यासाठी प.पू. डॉक्टरांचे प्रयत्‍न !
३ ई १ सभेची पूर्वसिद्धता प.पू. डॉक्टरांनी जातीने पहाणे : सभा असलेल्या शहरातील साधकांकडे
प.पू. डॉक्टर थांबत आणि सभा चालू होण्याच्या वेळेपूर्वी १५-२० मिनिटे सभास्थळी येत. काही ठिकाणी सभेची सिद्धता चालू असतांना प.पू. डॉक्टर स्वत: सिद्धता पहाण्यासाठी येत आणि त्यामधे सुधारणा सुचवून रहाण्याच्या ठिकाणी परत जात असत. सभा संपल्यानंतर कोणी जिज्ञासू भेटण्यास आल्यास त्याला ते भेटत. त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देत आणि निवासाच्या ठिकाणी निघून जात.
३ ई २. सभेच्या आरंभापासूनच प.पू. डॉक्टरांकडून त्रुटींविषयी लिखाण होणे : प.पू. डॉक्टर सभास्थळी व्यासपिठावर आसनस्थ झाल्यानंतर सूत्रसंचालक कार्यक्रमाचा आरंभ करत असे. त्यानंतर प.पू. डॉक्टरांचा परिचय करून दिला जाई आणि प.पू. डॉक्टरांचे औक्षण करून त्यांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ होत असे. या १०-१५ मिनिटांच्या अवधीत प.पू. डॉक्टर प्रदर्शन कक्ष, सभास्थळाची मांडणी इत्यादीच्या संदर्भात झालेल्या त्रुटी कागदावर लिहित असत आणि या त्रुटी प्रवचन संपवून निवासव्यवस्थेकडे जातांना व्यासपिठाच्या व्यवस्थापनाचे दायित्व असणार्‍या साधकाकडे देऊन जात. `या त्रुटी पुढच्या सभेत होणार नाहीत, याची काळजी घेतली जावी', हा त्यामागील उद्देश होता.
३ ई ३. सभेपूर्वी प.पू. डॉक्टरांकडून प्रदर्शन कक्षाची आवर्जून पहाणी ! : साधारणत: सर्व ठिकाणच्या प्रदर्शनाचे स्वरूप एकच होते. तरीही प.पू. डॉक्टर प्रत्येक ठिकाणचे प्रदर्शन पहात असत आणि त्यात काही त्रुटी राहिल्या असल्यास साधकांना त्या लिहून देत असत.
३ ई ४. सेवा परिपूर्ण व्हावी, यासाठी सभेनंतर साधकांच्या चुकांची होणारी बैठक ! : सभा झाल्यानंतर साधकांकडून सभेची सिद्धता करतांना झालेल्या चुकांची बैठक घेत आणि पुढच्या सभेत त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी त्या चुकांची माहिती पुढील सभेच्या ठिकाणी पाठवून देत. साधकांची सेवा परिपूर्ण व्हावी, याची तळमळ प.पू. डॉक्टरांनाच असे. ज्या ठिकाणी ते बैठकीसाठी उपस्थित राहू शकत, तेथे ते उपस्थित रहात अन्यथा तेथील दायित्व असणार्‍या साधकांना बैठक घ्यायला सांगत.
३ ई ५. सोसाट्याच्या वार्‍यात प्रदर्शनाची हानी होणार नाही, असे प्रदर्शन लावण्याविषयी प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शन करणे : साधकांना व्यासपिठाचे व्यवस्थापन शिकवण्याच्या दृष्टीने व्यासपिठाची सिद्धता चालू असतांनाच प.पू. डॉक्टर सभास्थळी आल्याची घटना गणपतीपुळे येथील सभेच्या वेळी घडली होती. सभास्थळ समुद्रकिनार्‍यावर असल्यामुळे सोसाट्याच्या वार्‍यात प्रदर्शनाचे तक्‍ते, व्यासपिठाच्या मागील पडदा उडत होता. अशा परिस्थितीत व्यासपीठ आणि प्रदर्शन कक्ष उभारण्याचा अनुभव कोणालाच नव्हता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे प्रसारसाहित्याची नासधूस होण्याची शक्यता होती; मात्र प.पू. डॉक्टरांनी स्वत: तिथे येऊन `अशा परिस्थितीत प्रदर्शन कसे लावावे', याविषयी आणि व्यासपिठाच्या उभारणीविषयी काही मौलिक सूचना दिल्या. त्यामुळे कोणतेही विघ्न न येता किंवा प्रसारसाहित्याची कोणतीही हानी न होता ती सभा झाली.
३ उ. शंभर सभांसाठी एक सदरा, एक विजार (पँट) परिधान करणे, हा प.पू. डॉक्टरांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय ! : या शंभर सभांसाठी प.पू. डॉक्टरांनी अवघा एक सदरा आणि एक विजार (पँट) वापरली. सभा संपल्यानंतर त्यांचा सदरा आणि विजार धुऊन सुकत घातली जात असे आणि दुसर्‍या दिवशी सभेपूर्वी तो इस्त्री करून परिधान केला जात असे. असे करण्यामागे प.पू. डॉक्टरांची दूरदृष्टी होती. प.पू. डॉक्टरांच्या सर्व ठिकाणच्या सभांचे ध्वनीचित्रीकरण होत असे. या सर्व सभांमधील चांगला भाग निवडून एक ध्वनीचित्रफीत सिद्ध करायची होती. प.पू. डॉक्टरांनी वेगवेगळे कपडे परिधान केले असते, तर अंतिम होणारी ध्वनीचित्रफीत चांगली वाटली नसती. म्हणून त्यांनी सर्वच्या सर्व सभा एक सदरा आणि एक विजार याच्यावरच केल्या.
४. जाहीर सभांच्या संदर्भातील अनुभूती
४ अ. `जेवढी कनात तितके लोक !' - प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वचनाची प्रचीती ! : जाहीर सभांचे व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने चर्चा करत असतांना प.पू. डॉक्टर एकदा म्हणाले `जेवढी कनात बांधाल, तितके लोक येतील.' म्हणजे `साधक जितकी अपेक्षा ठेवतील, तितके लोक येतील', हा प.पू. डॉक्टरांच्या म्हणण्याचा भावार्थ होता.प.पू. डॉक्टरांच्या या आशीर्वचनाची प्रचीती पुढे सर्वच सभांमध्ये आली. बहुतांश सभांमध्ये जिज्ञासू मोठ्या संख्येने आल्यामुळे कनाती सोडून मैदान उघडे ठेवावे लागले. मात्र `अपेक्षेपेक्षा अल्प लोक आले', असे कधी झाले नाही.
रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या छोट्या शहरात प.पू. डॉक्टरांच्या सभेचे आयोजन केले होते. या शहराची लोकसंख्या, तेथे चालू असलेले त्या वेळचे सनातनचे प्रसारकार्य या सर्वांचा विचार करता प.पू. डॉक्टर म्हणाले `येथे व्यासपीठ आणि काही उभारायला नको. शंभर जिज्ञासू बसू शकतील, अशा एखाद्या ठिकाणी सभा घेऊया.' स्थूलमानाने विचार करता `प.पू. डॉक्टर सांगतात, ते बरोबर ! येथे शंभरपेक्षा अधिक लोक येणार नाहीत', असेच वाटत होते. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टरांनी पुन्हा नेहमीप्रमाणे व्यासपीठ उभारण्यास सांगितले. विशेष म्हणजे शंभर लोकांचीही अपेक्षा नसलेल्या या सभेला पाचशेहून अधिक जिज्ञासूंनी उपस्थिती लावली.
४ आ. १२ तासांच्या प्रयत्‍नांनंतर उभे रहाणारे व्यासपीठ एके ठिकाणी अवघ्या तीन घंट्यांत उभे राहिले ! : सभेसाठी व्यासपीठ, प्रदर्शन उभारण्याची सेवा करण्यास एरव्ही १२ घंटे लागत. सकाळी ५ वाजता चालू झालेली सेवा सभा सुरू होण्याच्या क्षणापर्यंत चालूच असे; मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत हीच सेवा अवघ्या तीन घंट्यांतही पूर्ण करण्याचे बळ साधकांमध्ये निर्माण होत असे. याचीही प्रचीती आली. काही अडचणींमुळे उडुपी (कर्नाटक) येथील सभास्थळी पोहोचण्यास व्यासपिठाचे साहित्य नेणार्‍या गाडीला विलंब झाला. सभेची वेळ सायंकाळी पाच वाजता आणि वाहन पोहोचले दुपारी एक वाजता. सभेच्या ठिकाणाची पाहणी, साधकांची जुळवाजुळव आदी करता-करता प्रत्यक्ष सेवा चालू व्हायला दुपारचे दोन वाजले. आश्चर्य म्हणजे ही सेवा सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णही झाली. (एरव्हीच्या सभांमध्ये व्यासपीठ उभारावे लागत असे. येथे व्यासपीठ उभारावे लागले नाही; मात्र इतर सेवा इतक्या अल्पावधीत होणे, ही व्यासपीठ व्यवस्थेतील साधकांसाठी अनुभूती होती.)
४ इ. प.पू. डॉक्टरांच्या सभांवर वरुणराजाचीही कृपादृष्टी ! : रत्‍नागिरी जिल्ह्यात पाचल या आडवळणाच्या गावात प.पू. डॉक्टरांची सभा चालू होती. त्या वेळी व्यासपिठाच्या सेवेतील काही साधक सुमारे ५०० मीटर अंतरावर काही सेवेनिमित्त गेले होते. काही वेळ गेल्यानंतर तिथे पाऊस चालू झाल्यामुळे सभास्थळीचे प्रसारसाहित्य भिजून खराब होऊ नये, म्हणून ते साधक धावत-पळत सभेच्या ठिकाणी आले. सभास्थळी पोहोचल्यावर त्यांना आढळले की, तेथे पावसाचा एक थेंबही पडलेला नाही !
४ ई. साधकांना अनुभूती देणार्‍या जाहीर सभा ! : सभेत `साधना', हा विषय चालू असतांना बर्‍याच जणांना `नामजप चांगला होणे, ध्यान लागणे, प्रवचन ऐकून साधना करावीशी वाटणे', अशा अनुभूती येत. प.पू. डॉक्टरांच्या प्रवचनाच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूतींचे प्रमाण इतके मोठे होते की, सनातन-निर्मित `साधकांच्या अनुभूती' या ग्रंथातील पाचवे प्रकरण या अनुभूतींनीच व्यापले आहे.
५. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे काही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम !
५ अ. सनातनच्या पुढील प्रसारकार्यासाठी उपयुक्‍त ठरणार्‍या निरनिराळया संकल्पनांचा उगम ! : प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा म्हणजे सनातनच्या पुढील काळात होणार्‍या व्यापक प्रसारकार्याची एक रंगीत तालीम होती. या सभांमध्ये प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्‍त ठरणार्‍या अनेक संकल्पनांचा उगम झाला. या संकल्पना पुढील काळात सनातनची ओळख बनून राहिल्या. `साधना आणि क्षात्रधर्म' असे लिहिलेला पिवळया रंगाचा झेंडा, सध्या सनातनचे साधक घालत असलेली पिवळी टोपी यांची निर्मिती या सभांच्या काळातच झाली. क्षात्रधर्म केलेल्या अवतारांच्या (श्रीराम, परशुराम, श्रीकृष्ण आणि मारुति यांच्या) चित्रांची निर्मिती याच सभांच्या निमित्ताने झाली आणि ती सभास्थानी लावली जात. व्यासपिठावर लावण्यात येणारे श्रीकृष्ण-अर्जुन असलेल्या रथाचे चित्रही त्या काळापासून वापरण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे ही सर्व चित्रे प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी साधना म्हणून काढली होती.
५ आ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर उच्चभ्रूंनी त्वरित शारीरिक सेवेला प्रारंभ केला ! : मंगळुरू (कर्नाटक) येथील सभेला उच्चभ्रू जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पू. डॉक्टरांनी तेथील प्रवचनात साधनेअंतर्गन सत्सेवेचे महत्त्व सांगितले होते. या विषयाच्या अनुषंगाने सभेला उपस्थित असलेल्या बहुतांश उच्चभ्रू जिज्ञासूंनी स्वत:च्या मुलाबाळांसह सभेनंतरचे साहित्य `सत्सेवा' म्हणून आवरले.
६. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची प्रसिद्धीमाध्यमांकडून दखल नाही !
एरव्ही एखाद्या राजकारण्याने काहीही दायित्वशून्य वक्‍तव्य केले किंवा राजकीय कागाळया काढल्या की, त्याचे भले मोठे वृत्त देणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी प.पू. डॉक्टरांनी जाहीर सभांच्या माध्यमातून केलेल्या राष्ट्र आणि धर्म हिताच्या या कार्याची दखलही घेतली नाही. प.पू. डॉक्टरांच्या सभांना सहस्रावधी जिज्ञासू येत. तरीही काही अपवाद वगळता प्रसिद्धीमाध्यमांना `या कार्यक्रमांची दखल घ्यावी', असे वाटले नाही. `वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळा' या मारुतिरायाच्या वर्णनाप्रमाणे सनातनही मोठी होईल, याचे भय प्रसिद्धीमाध्यमांना तेव्हापासूनच वाटायला लागले होते आणि त्याबरोबर त्यांचा सनातनद्वेषही वाढत गेला, असे म्हणायला आता हरकत नाही.
(या लेखाच्या संकलनासाठी प.पू. डॉक्टरांच्या सभांच्या व्यासपिठाच्या नियोजनात सहभागी झालेले श्री. दिनेश शिंदे आणि श्री. श्याम गोवेकर यांचे अमोल सहकार्य लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञता !)

प.पू.डॉक्टरांच्या सभांच्या संदर्भात अशा प्रकारचे उद्बोधक अनुभव अजून कोणाला आले असतील, तर त्यांनी ते panveldainik@gmail.com या पत्त्यावर पाठवणे

Thursday, July 22, 2010

धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर



सनातन संस्थेच्या समष्टी कार्यातील आरंभीच्या काळात सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांच्या मनात `साधना आणि धर्मजागृती' या दोन्ही विषयांचे बिजारोपण केले; मात्र हा विषय उच्चरवाने समाजाला सांगण्याचा आरंभ ख्रिस्तब्द १९९७ मध्ये झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांमुळे झाला. शंभरहून अधिक झालेल्या या सभांचा काळ खरोखरंच रोमांचकारी होता. या काळातील अनेक घटना आजही दूरचित्रवाणी पाहिल्याप्रमाणे स्पष्टपणे डोळयांसमोरून सरकतात. इतक्या त्या मनात ठसल्या आहेत. अर्थात या सर्व घटना गुरुमाऊली प.पू. डॉक्टर यांच्या संबंधात आहेत. कसे होते, हे सोनेरी पान ?
संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
पूर्वार्ध
१. लेख लिहिण्यामागील पूर्वपिठिका आणि हेतू
१ अ. प.पू. डॉक्टर यांना त्यांच्या ऐतिहासिक कार्याच्या कर्तेपणाचाही विसर !
प.पू. डॉक्टर यांनी १९९७ साली किती जाहीर सभा घेतल्या, याची नेमकी संख्या एका लिखाणात नोंद करण्याच्या दृष्टीने एका साधकाने प.पू. डॉक्टर यांना विचारले. त्या वेळी प.पू. डॉक्टर यांनी या सभांचा आकडा ८-१० असा सांगितला. `हा आकडा १०० हून अधिक आहे', असे साधकाने सांगूनही प.पू. डॉक्टर यांनी `नाही...नाही इतक्या सभा झाल्या नाहीत', असे सांगितले. प.पू. डॉक्टर यांच्या या सभांना उपस्थित राहून ध्वनीचित्रीकरण करणारा साधक, या सभांचे व्यवस्थापन पहाणारे साधक यांना याविषयी विचारल्यावर `या सभांची संख्या १०० हून अधिक आहे', असे त्यांनी सांगितले. हे ऐकून काही न करता आत्मप्रौढी मिरवण्याची प्रथा पडलेल्या या जगात `करून सवरून नामानिराळे राहाण्याची' उच्च शिकवण कृतीतून देणारे गुरु लाभले, याविषयीची कृतज्ञता वाटली. त्यांनी घडवलेला हा इतिहास मानवजातीसाठी आणि धर्मजागृतीच्या कार्यात दीपस्तंभ ठरावा, या उद्देशाने शब्दबद्ध व्हावा, हाच या लेखामागील हेतू !
भव्य व्यासपीठ : मध्यभागी श्रीकृष्णार्जुनाचा पडदा तर डाव्या बाजूला श्रीराम आणि वीर हनुमान उजव्या बाजूला श्रीकृष्ण आणि परशुराम अशी राष्ट्र आणि धर्मविषयक कार्यास प्रेरणा देणारी व्यासपिठाची रचना
२. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचा इतिहास आणि स्वरूप !
२ अ. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा - सनातनच्या इतिहासातील एक सोनेरी पान ! : १९९७ हे वर्ष ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून गणले जाईल. सनातनच्या इतिहासात अशी अनेक सोनेरी पाने असतील, तरीही या पानाला विशेष महत्त्व असेल. याचे कारण म्हणजे प.पू. डॉक्टरांनी या वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांत फिरून १०० हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या. विषय होता `साधना आणि क्षात्रधर्म' ! या जाहीर सभा होण्यापूर्वीचे सनातनचे कार्य वैयक्‍तिक उन्नतीसाठी साधना आणि अध्यात्म इथपर्यंतच मर्यादित होते आणि ते चार भिंतींमध्येच मर्यादित होते. शाळेतील वर्ग किंवा अधिकाधिक एखादे सभागृह घेऊन अध्यात्माचा विषय मांडणे, इतकीच त्याची व्याप्‍ती होती; परंतु साधनेचे महत्त्व समाजातील सर्व लोकांना सांगण्यासाठी मोकळया पटांगणात मोठे व्यासपीठ उभारून जाहीर सभा घेण्याचा पहिलाच प्रयोग या सभांच्या माध्यमातून झाला. विशेष म्हणजे तो यशस्वीही झाला; कारण प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक सभेला अपेक्षेपेक्षा अधिक लोक येत. जिल्ह्याच्या ठिकाणी होणार्‍या सभेला ८-१० सहस्र जिज्ञासू असत. सांगली येथील सभेला तर १२ सहस्र लोक उपस्थित होते, तर तालुका स्तरावरील सभेला ४ ते ५ सहस्र जिज्ञासू असत, हे विशेष !
२ आ. स्वार्थी नव्हे, नि:स्वार्थ हेतूने जाहीर सभांचे आयोजन !
निवडणुका जवळ आल्या की, पुढच्या पाच वर्षांसाठी खुर्ची मिळवण्याचे ध्येय बाळगून विविध राजकीय पक्षांचे पुढारी प्रचाराला बाहेर पडतात. त्यांच्या दिमतीला असते हेलिकॉप्टर किंवा विमान, गाड्यांचा ताफा, सहस्रो कार्यकर्ते आणि बक्कळ पैसा ! तरीही या पुढार्‍यांच्या `अमुक दिवसांत तमुक इतक्या सभा घेतल्या', अशी शेखी मिरवणार्‍या बातम्या वृत्तपत्रात छापून येतात. प.पू. डॉक्टर यांनी घेतलेल्या जाहीर सभांच्या प्रसारासाठी साधक संख्या अल्प होती, साधनसामग्रीची न्यूनता होती. महाप्रसाद, दर्शन, व्यावहारिक समस्या निवारण यांसारखी लौकिकातील कोणतीही आमिषे नव्हती. कोणताही बडेजाव न मिरवता दिवस-रात्र प्रवास करून प.पू. डॉक्टरांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी नि:स्वार्थ हेतूने घेतलेल्या सभांचे मोल किती असेल, याचा अंदाज राष्ट्र आणि धर्म यांसाठी पदरमोड करून समर्पित जीवन जगणार्‍या व्यक्‍तीलाच येईल.
छायाचित्रात जाहीर सभेत जिज्ञासूंना मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले
२ इ. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे स्वरूप !
२ इ १. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची व्याप्‍ती ! : प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्‍नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई या जिल्ह्यांत, तसेच गोवा, उत्तर कर्नाटक या ठिकाणी सभा घेतल्या. प्रत्येक जिल्ह्यात ७-८ सभा घेतल्या जात.
२ इ २. जाहीर सभांसाठी प.पू. डॉक्टरांसमवेत फिरणारे साहित्य ! : सभेच्या ठिकाणी लागणारे व्यासपीठ, कनात (बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा), प्रदर्शनाचे साहित्य, विद्युतजनित्र, ध्वनीक्षेपक यंत्रणा, विद्युत उपकरणे असे सभेसाठी लागणारे इत्यंभूत साहित्य असलेला टेम्पो या सर्व ठिकाणी जात असे आणि सभेची सिद्धता करत असे.
२ इ ३. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झालेला जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच !
२ इ ३ अ: पाच-सहा महिने चालू असलेली जाहीर सभांची पूर्वसिद्धता ! : या सभांसाठीच्या व्यासपिठाचा आकार सुमारे २० २० फुटांचा असे आणि उंचीही तितकीच असे. जिज्ञासूंची बैठक व्यवस्था किमान २०० फूट लांब आणि १०० फूट रूंद असे. प्रदर्शन कक्षाचा आकारही १०० फूट लांब आणि १५ फूट रूंद असे. या सभांची सिद्धता पाच-सहा महिने अगोदर चालू होती.
२ इ ३ आ. एके दिवशी उभा होणारा आणि काढता येणारा जाहीर सभांच्या सिद्धतेचा संच ! : सभेसाठी उभारले जाणारे व्यासपीठ, जिज्ञासूंच्या बैठक व्यवस्थेच्या सभोवताली बांधला जाणारा पडदा, प्रदर्शन कक्ष हे सर्व एकाच दिवशी उभे करून सभा झाल्यानंतर त्याच दिवशी काढणे सोयीस्कर होईल, अशा पद्धतीने हा संपूर्ण संच निर्माण करण्यात आला होता. असे असूनही `यातील भव्यता घटली', असे कुठेच झाले नाही.
२ इ ३ इ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व्यासपीठ उभारण्याचे प्रात्यक्षिक ! : विशेष म्हणजे हा संपूर्ण संच निर्माण करण्याच्या सर्व बारीकसारीक प्रक्रियेमध्ये प.पू. डॉक्टरांनी कटाक्षाने लक्ष घातले होते. `व्यासपीठ कशा प्रकारे लगेचच उभारता येईल', `किती वेळात उभे राहील', अशा सर्व प्रक्रियेचे प्रात्यक्षिक त्यांनी साधकांकडून करून घेतले होते. या प्रक्रियेतील व्यावसायिक माहिती आणि अनुभव कोणाही साधकाला नव्हता. सर्व साधक प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सर्व कृती करायचे आणि त्यात यशही यायचे.
२ इ ४. अविश्रांत होणार्‍या जाहीर सभा ! : एका जिल्ह्यात ८-९ सभा आयोजित केल्या असल्यास त्या सभा `प्रतिदिन एका ठिकाणी', अशा प्रकारे एकही दिवस विश्रांती न घेता होत असत. मग उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एक दिवस दिला जात असे आणि पुढे दुसर्‍या जिल्ह्यातील सभा चालू होत. सभा संपल्यानंतर सर्व साहित्य गुंडाळून रातोरात पुढच्या सभेसाठी जावे लागत असे. तिथे पहाटे ५ वाजल्यापासून ते सायंकाळी सभा चालू होण्याच्या क्षणापर्यंत सभास्थळ उभारण्यात व्यतीत होत असे. हे सभास्थळ उभारण्यात साधारणत: ६० ते ७० साधक ऊन, वारा, थंडी, पाऊस यांची पर्वा न करता अव्याहत सेवा करत.
२ इ ५. सर्व वर्गांतील लोकांकरता सुलभ ठरणारी जाहीर सभांची वेळ ! : सभांची वेळही अशी निवडण्यात येत असे की, लोक नोकरीवरून सुटल्यावर सभेला येऊ शकत आणि महिलावर्ग स्वयंपाक करण्याच्या वेळेपर्यंत घरी पोहोचे. त्यामुळे या सभांना सर्व वर्गांतील लोकांची उपस्थिती असे.
२ इ ६. सभेपूर्वी ग्रामदेवता आणि स्थानदेवता यांचे आशीर्वाद घेणे : प.पू. डॉक्टर प्रत्येक सभेच्या पूर्वी त्या शहरातील स्थानदेवता वा ग्रामदेवता यांच्या देवस्थानात जाऊन आशीर्वाद घेत असत. स्थानदेवता वा ग्रामदेवता यांचा आशीर्वाद घेणे आणि सभेत अडथळे आणू पहाणार्‍या शक्‍तींपासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रार्थना करणे, असा हेतू ते सांगत !
छायाचित्रात जाहीर सभेतील उपस्थित जिज्ञासू
२ इ ७. बहुसंख्य जिज्ञासूंच्या भाषेप्रमाणे जाहीर सभेत मार्गदर्शन ! : प.पू. डॉक्टरांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सभा घेतल्या. मराठी भाषिकांची संख्या अल्प असणार्‍या ठिकाणी सभा चालू होण्यापूर्वी ते जिज्ञासूंना `सभा हिंदीतून घ्यायची कि इंग्रजीतून' हे विचारत आणि जिज्ञासूंना हात वर करण्यास सांगत. बहुसंख्य जिज्ञासू जी भाषा सांगत, त्या भाषेतून ते प्रवचन करत.
२ इ ८. सभेप्रमाणे मार्गदर्शनाच्या मांडणीत परिवर्तन ! : सभेचा विषय `साधना आणि क्षात्रधर्म' असला, तरी समोरील श्रोतावर्ग पाहून प.पू. डॉक्टर विषयाची मांडणी करत. प्रत्येक सभेच्या ठिकाणी नवीन सूत्रे असत, उदा. पहिल्या सभेत गुरुकृपायोगानुसार साधनेची ४ तत्त्वे सांगितली होती. सर्व सभा होईपर्यंत गुरुकृपायोगानुसार साधनेची एकूण ७ तत्त्वे अंतर्भूत झाली होती.
२ इ ९. उपस्थितांसाठी भारतीय बैठक, तर वृद्धांसाठी आसंदी ! : एरव्हीच्या सभांमध्ये मान्यवर किंवा वार्ताहर यांसाठी दिसणारी वेगळी आसनव्यवस्था या सभांच्या वेळी नसे. सर्वांना भारतीय बैठकीतच बसावे लागे. त्यामुळे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हेदेखील वेगळया आसनव्यवस्थेची अपेक्षा न ठेवता भारतीय बैठकीतच बसत; मात्र वृद्ध, अपंग यांना आसंदी (खुर्ची) दिली जात असे.
२ इ १०. बाहेरून आलेल्या साधकांची सभेपूर्वी व्यासपिठावरून होणारी ओळख आणि त्यामागील प.पू. डॉक्टरांचा हेतू ! : सभेची पूर्वसिद्धता शिकण्यासाठी पुढील सभा असणार्‍या जिल्ह्यांतील साधकही सभास्थानी येत. त्या सर्वांची ओळख त्यांना व्यासपिठावर बोलवून करून देण्यात येत असे. `सनातन संस्थेचे कार्य किती व्यापक प्रमाणात चालू आहे, याची समाजाला माहिती व्हावी', हा प.पू. डॉक्टरांचा असे करण्याचा हेतू होता.
३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !
३ अ. सभांच्या माध्यमांतून दिसलेला प.पू. डॉक्टरांचा साधेपणा ! : या सभा समाजाला अध्यात्माकडे वळवण्याच्या उद्देशाने आयोजित केल्या. त्यामुळे एरव्हीच्या सभांमध्ये दिसणार्‍या भपकेबाजपणाला प.पू. डॉक्टरांनी आवर्जून दूर ठेवले होते. हे दर्शवणार्‍या काही घटना पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ १. हार-तुर्‍यांनी सत्कार नसणे : प.पू. डॉक्टर व्यासपिठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्थानिकांपैकी एक साधक सपत्‍निक येऊन प.पू. डॉक्टरांना तिलक लावून पुष्पगुच्छ देत असे. या कार्यक्रमात हार-तुर्‍यांचा शिरकाव प.पू. डॉक्टरांनी कधीही होऊ दिला नाही. त्यांना देण्यात येणारे पुष्पगुच्छही बाजारातून विकत आणलेला नसे, तर साधकांनी स्वहस्ते बनवलेला असे. अर्थात ही साधेपणाची शिकवण प.पू. डॉक्टरांनीच साधकांना दिली होती.
३ अ २. या सभांमध्ये त्यांनी कधी पुढारी, नेता अशा दुसर्‍या कोणाकडून सत्कार करून घेतला नाही.
३ अ ३. या सभेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे व्यासपिठाच्या मधोमध प.पू. डॉक्टरांना बसण्यासाठी साधी खुर्ची असायची. (सध्या राजकारण्यांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर दोन-तीन ओळीत बसणारी नेतेमंडळी पाहून सवय झालेल्या लोकांना याचे थोडे आश्चर्यच वाटे.)
३ अ ४. व्यासपिठामागील पडद्यावर प.पू. डॉक्टरांचे नाव नसणे : त्यांच्या खुर्चीच्या शेजारी छोटीशी फुलदाणी, पेन, कागद, पाणी ठेवण्यासाठी टी-पॉय ठेवलेला असायचा. मागे व्यासपीठ व्यापून टाकेल, इतका भव्य कृष्णार्जुनाचा पडदा लावला जाई; मात्र त्यावर प.पू. डॉक्टर यांचे नाव वा अन्य कोणताही उल्लेख नव्हता.
३ अ ५. जाहीर सभांसाठीची नियमावली ही प.पू. डॉक्टर निर्मितच ! : प.पू. डॉक्टर जाहीर सभांच्या अगोदर नियमावली सिद्ध करत, उदा. `निवासाच्या ठिकाणी जेवणासाठी खिचडी आणि पापड', `सभेमधे हार नको; पुष्पगुच्छ द्यावे', `जेथे मी जाईन, तेथे पाद्यपूजा नको' इत्यादी.
३ अ ६. स्वयंनिर्मित नियमांचे पालन प.पू. डॉक्टर स्वत: करत असल्याची काही उदाहरणे
३ अ ६ अ. पाद्यपूजा न स्वीकारणे : गुहागर (जिल्हा रत्‍नागिरी) येथे सभा संपल्यानंतर प.पू. डॉक्टरांची रहाण्याची व्यवस्था ज्या साधकांकडे होती, त्या साधकाने प.पू. डॉक्टरांची पाद्यपूजा करण्याची सिद्धता केली होती. ते पाहून प.पू. डॉक्टर तडक मागे फिरले आणि गाडीत बसून चिपळूण येथे दुसर्‍या साधकाकडे रहाण्यासाठी निघून गेले. त्या वेळी रात्रीचे १० वाजले होते.
३ अ ६ आ. सजावट केलेल्या पलंगावर विश्रांती न घेणे : गणपतीपुळे येथे प.पू. डॉक्टरांच्या निवासाचे नियोजन ज्या साधकाकडे होते, त्या साधकाने प.पू. डॉक्टर ज्या पलंगावर झोपणार होते, त्या पलंगाच्या चारही बाजूला सत्यनारायण पूजेच्या वेळी लावतात, तसे केळीचे खांब आणि पाने लावली होती. ते पहाताच प.पू. डॉक्टर तेथे न रहाता व्यासपीठ उभारणार्‍या साधकांची निवासव्यवस्था केली होती, त्या ठिकाणी पूर्ण दिवस राहिले.
३ आ. जाहीर सभांच्या माध्यमातून प.पू. डॉक्टरांनी साधकांना दिलेली वक्‍तशीरपणाची शिकवण !
३ आ १. वेळेत चालू होणार्‍या आणि संपणार्‍या जाहीर सभा ! : जाहीर सभांच्या कालावधीत
प.पू. डॉक्टरांकडून अनेक गुण साधकांना शिकायला मिळाले. त्यामध्ये `वक्‍तशीरपणा' हा गुण प्राधान्याने सांगावासा वाटतो. या शंभर सभांमध्ये सर्वच सभा जाहीर केलेल्या वेळी चालू होत आणि संपत.
प.पू. डॉक्टर व्यासपिठावर पोहोचायला वा अन्य कोणत्या कारणासाठी सभा ५ मिनिटे उशिरा चालू झाली, असे झाले नाही किंवा विषय संपवायला ५ मिनिटे उशीर लागला किंवा वेळ संपत आली; म्हणून विषय आवरता घेतला किंवा थोडा अधिक गतीने घेतला असेही झाले नाही; म्हणून साधक या सभांचा प्रचार करतांनाच समाजाला सांगत, `आमची सभा वेळेत चालू होईल आणि वेळेत संपेल.'
३ आ २. सभा वेळेत चालू करण्याविषयीचा प.पू. डॉक्टरांचा काटेकोरपणा ! : सभा वेळेत चालू करण्याविषयी प.पू. डॉक्टर किती काटेकोर होते, हे दर्शवणारा प्रसंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सभेच्या निमित्ताने अनुभवायला मिळाला. कुडाळ येथील सभेला येण्यासाठी प.पू. डॉक्टर सकाळी ५ वाजता मुंबईहून निघाले. तेव्हा त्यांना ताप आला होता. अशक्‍तपणामुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हते. तरीही ते चारचाकीने १२ तास प्रवास करून सभेला आरंभ होण्यापूर्वी १५ मिनिटे सभास्थानी पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अल्पाहार किंवा चहा-पाणी न घेता ते थेट व्यासपिठावर जाऊन बसले आणि प्रवचन पूर्ण करूनच उठले.
३ आ ३. उशिरा चालू झालेल्या एका सभेत उपस्थितांची क्षमा मागणारे प.पू. डॉक्टर ! : या वक्‍तशीरपणाला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील सभा अपवाद ठरली. ही सभा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा चालू झाली. साधकांच्या नियोजनातील चुकीमुळे हा उशीर झाला होता. तरीही प.पू. डॉक्टरांनी प्रवचनाच्या आरंभीच उशीर झाल्याविषयी उपस्थितांकडे क्षमा मागितली होती.

Sunday, July 5, 2009

हिंदूंकडून राष्ट्रविघातक कारवाया अशक्य ! - गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल

येत्या २६ नोव्हेंबरला मुंबईवरील अतिरेक्यांच्या आक्रमणाला एक वर्ष पूर्ण होईल. अजमल कसाब याला न्याय मिळावा, यासाठी धडपडणारे काँग्रेस शासन आक्रमणात ठार झालेल्या १८९ जणांना न्याय मिळावा म्हणून कधीच तडफडतांना दिसत नाही. उलट हिंदु आतंकवादी ही नवीन जमात निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्‍न करत आहे. त्यातीलच एक मालेगाव अन् मडगाव या घटनांमध्ये `बादरायण' संबंध जोडण्याच्या प्रयत्‍नाला, भारताच्या गुप्‍तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ``हिंदु संघटनांकडून किंवा हिंदुत्ववादी विचारधारेकडून राष्ट्रविघातक कारवाया घडण्याची मला सुतराम शक्यता वाटत नाही'', असे म्हणत त्यांनी `हिंदु आतंकवादी' या संकल्पनेचा फज्जा उडवला आहे. त्यांची ,`रेडिफ' या संकेतस्थळावरील ही मुलाखत दैनिक `तरुण भारत'ने प्रसिद्ध केली. ती येथे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
पत्रकार : २६ नोव्हेंबरच्या घटनेनंतर `इंटेलिजन्स'च्या क्षमतेमध्ये काही फरक पडला आहे, असे तुम्हाला वाटते का ? दोव्हाल : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये एका रात्रीत बदल होऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने आपली कौशल्ये, शक्‍तीस्थाने आणि क्षमता अद्ययावत कराव्या लागतात आणि हे पालट गुणात्मक, रचनात्मक कार्यपद्धतीमधीलही असतात.पत्रकार : `इंटेलिजन्स' (गुप्‍तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये पालट म्हणजे नेमके काय ? ही संकल्पना जरा सविस्तर सांगाल ?दोव्हाल : स्पष्टपणे सांगायचे झाले, तर भारतामधील गुप्‍तवार्ता विभागामधील पालट हे प्रतिक्रियात्मक असतात. तपासकार्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी काही त्रुटी आढळल्या की, त्या दुरुस्त करणे अपरिहार्य असते. प्रथम झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे, हे या पालटाचे प्राथमिक उद्दिष्ट असते; पण कित्येकदा हे पालट तुटपुंजे ठरतात. आता मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचे उदाहरण पाहूया. हे आक्रमण पंचतारांकित हॉटेलांवर झाले होते. सुरक्षाव्यवस्थेमध्ये आणि हॉटेलला सुरक्षा पुरवण्याच्या यंत्रणेत आपण सुधारणा केल्या. यामुळे देशातील हॉटेल्स संपूर्णपणे सुरक्षित झालीही; पण देशाला असलेला आतंकवाद्यांचा धोका कमी झालेला नाही. कारण आतंकवादी पुढील वेळी पंचतारांकित हॉटेलवरच आक्रमण करतील, याची शक्यता नाही. थोडक्यात पालट घडवतांना आतंकवाद्यांच्या पालटत्या मनोवृत्तीचा, कार्यपद्धतीचा आणि क्षमतांचा वेध घेऊन ते घडवून आणावे लागतील. इथे प्रतिक्रियेपेक्षा आधीच कार्यान्वित होण्याच्या पद्धतीची आवश्यकता आहे. जर अतिरेकी `व्यापक मनुष्यहानी' करणार्‍या क्षेपणास्त्रांनी आक्रमण करणार असतील, तर आपल्याला त्यादृष्टीने सिद्ध रहावे लागेल. कदाचित लष्करी तळ किंवा आण्विक तळावर आक्रमण करणे, हेही त्यांचे उद्दिष्ट असू शकते. विरोधी पक्षाला चकवा देता यावा, यासाठी आतंकवादी संघटना त्यांची कार्यपद्धती आणि जागा सतत पालटत असतात; पण जेव्हा ते असे करण्यात अयशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या कारवायांना लगाम घालणे शक्य होते. यासाठी ते त्यांचे लक्ष्य आणि मोहरे पालटत रहातात. त्यामुळे पालट हा संक्रमणासारखा असावा. मागील अपयशाच्या कारणांमध्ये दुरुस्त्या करत बसण्यापेक्षा तंत्र आणि तंत्रज्ञान, यांमध्ये गतीमानतेने आणि सहज ओळखता न येणारे पालट करणेही शहाणपणाचे ठरू शकते. `प्रत्येक पालट हा काळाच्या कसोटीला उतरलाच पाहिजे', हा हट्ट `इंटिलिजन्स'ला परवडणारा नाही. प्रत्येक वेळी काहीतरी अनपेक्षित आणि नवीन घडवून आणता येणे, हीच पालटाची गोम आहे. त्यासाठीच हेरखात्याला आतंकवाद्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता आला पाहिजे. पत्रकार : मुंबईवरील आक्रमणामागे स्थानिकांचे सहकार्य हीसुध्दा खूपच चर्चिली गेलेली बाब आहे; मात्र मुंबई पोलीस सातत्याने त्याचा इन्कार करत आले आहेत, आपले मत काय ? दोव्हाल : सहस्रावधी वर्षे आपल्याला युरेनियमचे अस्तित्व माहीत नव्हते, याचा अर्थ युरेनियमचे अस्तित्व नाही, असा होत नाही. मुंबईवरील आक्रमण कोणत्याही अर्धशिक्षित परकीय नागरिकांकडून, परक्या भूमीवर आणि तोसुद्धा इतक्या नेमकेपणाने, वेळ आणि दिशा यांच्या अचूकतेने होणं हे स्थानिक साहाय्याशिवाय शक्यच नाही. केवळ मुंबई पोलिसांना स्थानिक स्तरावर साहाय्य करणारे धागेदोरे दुर्दैवाने मिळवता न येणे, याचा अर्थ `स्थानिक साहाय्य नव्हते', असे म्हणता येत नाही. आपण आजवरच्या आतंकवादी घटनांचा आणि आक्रमणांचा तपशीलवार विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, कोणतेच आक्रमण हे स्थानिकांच्या सहकार्याशिवाय तडीस नेता आलेले नाही. पत्रकार : म्हणजे अजूनही `स्थानिक' तपासकार्याला वाव आहे, असे म्हणता येईल ? दोव्हाल : माझ्या मते युद्ध आपण जिंकल्यानंतरच संपुष्टात येते. प्रयत्‍न करायला हवा. त्यादृष्टीने येथे पुष्कळ वाव आहे. पत्रकार : आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे, असे वाटते का ? शिवाय पाकिस्तान त्यादृष्टीने काही प्रयत्‍न करत असल्याचे वाटते का ?दोव्हाल : भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर पाकिस्तानवर खरंच कोणताही दबाव टाकण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. पाकिस्तान वर्षानुवर्षांच्या आंतरराष्ट्रीय टिकेनंतर कोडगेपणाने वागू लागला आहे. आपल्या ढासळत्या प्रतिमेची पाकिस्तानला यत्किंचितही लाज वाटत नाही. स्वाभाविकच केवळ पाश्चिमात्य हितसंबंधांचा विचार करून त्या दृष्टीने अटकसत्र घडवणे म्हणजे प्रयत्‍न नव्हेत ! भारतविरोधी घातपाती कारवाया थांबवणे, घुसखोरी रोखणे, खोटी चलनव्यवस्था रोखणे, या दृष्टीने पाकिस्तानवर कोणताही दबाव नाही; मात्र अफगाणिस्तान-पाकिस्तान ही उभय राष्ट्रे अतिरेकीविरोधी व्हावीत, अशी पाश्चिमात्त्य राष्ट्रांची प्रामाणिक इच्छा दिसते एवढं नक्की ! पत्रकार : लष्कर-ए-तोयबाविषयी काय वाटते ? मुंबईवरील आक्रमणानंतर त्यांचे नटवर्क विस्कळीत झाले आहे, असे वाटते का ? दोव्हाल : अजिबात नाही. फक्‍त आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करून त्या संघटनेला सध्या नमतं घ्यायला लावलं गेलं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधा, आर्थिक स्त्रोत, नवीन भरती, `मर्कझ-दावा-उल-ईशाद' च्या छताखाली जिहादी मनोवृत्ती घडवणार्‍या शाळा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आदी सर्व कारवाया चालूच आहेत. पत्रकार : सिमी, इंडियन मुजाहिदीन याविषयी काय वाटते ? या संघटना सध्या शांत असणे, निष्क्रिय भासणे याचा अर्थ त्या संपल्या, असा घ्यावा का ? दोव्हाल : अजिबात नाही. या दोन्ही संघटना सध्या कार्यरत आहेत. संघटना म्हणून कदाचित त्यांचा प्रभाव कमी होत असेलही; पण त्या संपलेल्या नाहीत. त्यांचे खाजगी वा व्यक्‍तीगत पातळीला असलेलं `नेटवर्क' तितकच मजबूत आहे. पत्रकार : सध्या हिंदु संघटनांकडूनही आतंकवाद पसरवला जात असल्याचे बोलले जाते. तुम्हाला काय वाटते ? दोव्हाल : हिंदु संघटना आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांच्याकडून राष्ट्रविघातक हिंसा घडण्याची शक्यता मला वाटत नाहीच; किंबहुना कोणतीही हिंदु संघटना इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवू शकत नाहीत. तरीही अशा कोणत्याही प्रयत्‍नाला हाणून पाडलेच पाहिजे.