Sunday, July 5, 2009
हिंदूंकडून राष्ट्रविघातक कारवाया अशक्य ! - गुप्तवार्ता विभागाचे माजी महासंचालक अजितकुमार दोव्हाल
पत्रकार : २६ नोव्हेंबरच्या घटनेनंतर `इंटेलिजन्स'च्या क्षमतेमध्ये काही फरक पडला आहे, असे तुम्हाला वाटते का ? दोव्हाल : `इंटेलिजन्स' (गुप्तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये एका रात्रीत बदल होऊ शकत नाही. त्यासाठी सातत्याने आपली कौशल्ये, शक्तीस्थाने आणि क्षमता अद्ययावत कराव्या लागतात आणि हे पालट गुणात्मक, रचनात्मक कार्यपद्धतीमधीलही असतात.पत्रकार : `इंटेलिजन्स' (गुप्तवार्ता विभाग) च्या क्षमतेमध्ये पालट म्हणजे नेमके काय ? ही संकल्पना जरा सविस्तर सांगाल ?दोव्हाल : स्पष्टपणे सांगायचे झाले, तर भारतामधील गुप्तवार्ता विभागामधील पालट हे प्रतिक्रियात्मक असतात. तपासकार्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी काही त्रुटी आढळल्या की, त्या दुरुस्त करणे अपरिहार्य असते. प्रथम झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे, हे या पालटाचे प्राथमिक उद्दिष्ट असते; पण कित्येकदा हे पालट तुटपुंजे ठरतात. आता मुंबईवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचे उदाहरण पाहूया. हे आक्रमण पंचतारांकित हॉटेलांवर झाले होते. सुरक्षाव्यवस्थेमध्ये आणि हॉटेलला सुरक्षा पुरवण्याच्या यंत्रणेत आपण सुधारणा केल्या. यामुळे देशातील हॉटेल्स संपूर्णपणे सुरक्षित झालीही; पण देशाला असलेला आतंकवाद्यांचा धोका कमी झालेला नाही. कारण आतंकवादी पुढील वेळी पंचतारांकित हॉटेलवरच आक्रमण करतील, याची शक्यता नाही. थोडक्यात पालट घडवतांना आतंकवाद्यांच्या पालटत्या मनोवृत्तीचा, कार्यपद्धतीचा आणि क्षमतांचा वेध घेऊन ते घडवून आणावे लागतील. इथे प्रतिक्रियेपेक्षा आधीच कार्यान्वित होण्याच्या पद्धतीची आवश्यकता आहे. जर अतिरेकी `व्यापक मनुष्यहानी' करणार्या क्षेपणास्त्रांनी आक्रमण करणार असतील, तर आपल्याला त्यादृष्टीने सिद्ध रहावे लागेल. कदाचित लष्करी तळ किंवा आण्विक तळावर आक्रमण करणे, हेही त्यांचे उद्दिष्ट असू शकते. विरोधी पक्षाला चकवा देता यावा, यासाठी आतंकवादी संघटना त्यांची कार्यपद्धती आणि जागा सतत पालटत असतात; पण जेव्हा ते असे करण्यात अयशस्वी ठरतात, तेव्हा त्यांच्या कारवायांना लगाम घालणे शक्य होते. यासाठी ते त्यांचे लक्ष्य आणि मोहरे पालटत रहातात. त्यामुळे पालट हा संक्रमणासारखा असावा. मागील अपयशाच्या कारणांमध्ये दुरुस्त्या करत बसण्यापेक्षा तंत्र आणि तंत्रज्ञान, यांमध्ये गतीमानतेने आणि सहज ओळखता न येणारे पालट करणेही शहाणपणाचे ठरू शकते. `प्रत्येक पालट हा काळाच्या कसोटीला उतरलाच पाहिजे', हा हट्ट `इंटिलिजन्स'ला परवडणारा नाही. प्रत्येक वेळी काहीतरी अनपेक्षित आणि नवीन घडवून आणता येणे, हीच पालटाची गोम आहे. त्यासाठीच हेरखात्याला आतंकवाद्यांच्या दृष्टीकोनातून विचार करता आला पाहिजे. पत्रकार : मुंबईवरील आक्रमणामागे स्थानिकांचे सहकार्य हीसुध्दा खूपच चर्चिली गेलेली बाब आहे; मात्र मुंबई पोलीस सातत्याने त्याचा इन्कार करत आले आहेत, आपले मत काय ? दोव्हाल : सहस्रावधी वर्षे आपल्याला युरेनियमचे अस्तित्व माहीत नव्हते, याचा अर्थ युरेनियमचे अस्तित्व नाही, असा होत नाही. मुंबईवरील आक्रमण कोणत्याही अर्धशिक्षित परकीय नागरिकांकडून, परक्या भूमीवर आणि तोसुद्धा इतक्या नेमकेपणाने, वेळ आणि दिशा यांच्या अचूकतेने होणं हे स्थानिक साहाय्याशिवाय शक्यच नाही. केवळ मुंबई पोलिसांना स्थानिक स्तरावर साहाय्य करणारे धागेदोरे दुर्दैवाने मिळवता न येणे, याचा अर्थ `स्थानिक साहाय्य नव्हते', असे म्हणता येत नाही. आपण आजवरच्या आतंकवादी घटनांचा आणि आक्रमणांचा तपशीलवार विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की, कोणतेच आक्रमण हे स्थानिकांच्या सहकार्याशिवाय तडीस नेता आलेले नाही. पत्रकार : म्हणजे अजूनही `स्थानिक' तपासकार्याला वाव आहे, असे म्हणता येईल ? दोव्हाल : माझ्या मते युद्ध आपण जिंकल्यानंतरच संपुष्टात येते. प्रयत्न करायला हवा. त्यादृष्टीने येथे पुष्कळ वाव आहे. पत्रकार : आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे, असे वाटते का ? शिवाय पाकिस्तान त्यादृष्टीने काही प्रयत्न करत असल्याचे वाटते का ?दोव्हाल : भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर पाकिस्तानवर खरंच कोणताही दबाव टाकण्यात आपण यशस्वी ठरलेलो नाही. पाकिस्तान वर्षानुवर्षांच्या आंतरराष्ट्रीय टिकेनंतर कोडगेपणाने वागू लागला आहे. आपल्या ढासळत्या प्रतिमेची पाकिस्तानला यत्किंचितही लाज वाटत नाही. स्वाभाविकच केवळ पाश्चिमात्य हितसंबंधांचा विचार करून त्या दृष्टीने अटकसत्र घडवणे म्हणजे प्रयत्न नव्हेत ! भारतविरोधी घातपाती कारवाया थांबवणे, घुसखोरी रोखणे, खोटी चलनव्यवस्था रोखणे, या दृष्टीने पाकिस्तानवर कोणताही दबाव नाही; मात्र अफगाणिस्तान-पाकिस्तान ही उभय राष्ट्रे अतिरेकीविरोधी व्हावीत, अशी पाश्चिमात्त्य राष्ट्रांची प्रामाणिक इच्छा दिसते एवढं नक्की ! पत्रकार : लष्कर-ए-तोयबाविषयी काय वाटते ? मुंबईवरील आक्रमणानंतर त्यांचे नटवर्क विस्कळीत झाले आहे, असे वाटते का ? दोव्हाल : अजिबात नाही. फक्त आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार करून त्या संघटनेला सध्या नमतं घ्यायला लावलं गेलं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधा, आर्थिक स्त्रोत, नवीन भरती, `मर्कझ-दावा-उल-ईशाद' च्या छताखाली जिहादी मनोवृत्ती घडवणार्या शाळा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण आदी सर्व कारवाया चालूच आहेत. पत्रकार : सिमी, इंडियन मुजाहिदीन याविषयी काय वाटते ? या संघटना सध्या शांत असणे, निष्क्रिय भासणे याचा अर्थ त्या संपल्या, असा घ्यावा का ? दोव्हाल : अजिबात नाही. या दोन्ही संघटना सध्या कार्यरत आहेत. संघटना म्हणून कदाचित त्यांचा प्रभाव कमी होत असेलही; पण त्या संपलेल्या नाहीत. त्यांचे खाजगी वा व्यक्तीगत पातळीला असलेलं `नेटवर्क' तितकच मजबूत आहे. पत्रकार : सध्या हिंदु संघटनांकडूनही आतंकवाद पसरवला जात असल्याचे बोलले जाते. तुम्हाला काय वाटते ? दोव्हाल : हिंदु संघटना आणि हिंदुत्ववादी विचारधारा यांच्याकडून राष्ट्रविघातक हिंसा घडण्याची शक्यता मला वाटत नाहीच; किंबहुना कोणतीही हिंदु संघटना इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा घडवू शकत नाहीत. तरीही अशा कोणत्याही प्रयत्नाला हाणून पाडलेच पाहिजे.
Thursday, October 23, 2008
फरफट राजची नव्हे, महाराष्ट्राची झाली !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना मंगळवारी सकाळी अटक झाली, ती दिल्लीच्या दबावामुळे. हा दबाव रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव यांनी निर्माण केला. संपूर्ण महाराष्ट्र हिंसाचारी आहे, परप्रांतियांच्या विरोधात आहे, कायदा आणि सुव्यवस्था यांचे तेथे वाटोळे झाले आहे, अशी महाराष्ट्राची प्रतिमा देशभर निर्माण करण्यात विघ्नसंतोषी लोकांना यश आले आहे.
वास्तविक दिल्लीत सर्वश्री शरद पवार आहेत, सुशीलकुमार शिंदे आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत व अंतुले आहेत. यांना महाराष्ट्राच्या वतीने बोलता आले असते; पण कोणीही तोंड उघडायला सिद्ध नाही. आज मनसे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र विशिष्ट संकटात सापडला आहे; परंतु महाराष्ट्राच्या वतीने बोलणारा एकच एक नेता पुर्या देशात सापडत नाही. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे काम केवळ राज ठाकरे यांना अटक करणे नाही, तर सर्व राज्यांमध्ये समतोल राखणे, हे आहे. लालूप्रसाद, रामविलास व अमरसिंह या नेत्यांना कसलीही नीतीमूल्ये नाहीत. लुटालूट करण्यासाठी ते राजकारणात आले आहेत. मुंबई ही लुटालूट करण्याची मोठी जागा आहे, हीच त्यांची भावना आहे. आपापल्या राज्यातील लोकांना राष्ट्रप्रेम आणि नागरिकांची कर्तव्ये ते शिकवत नाहीत. या नेत्यांची इस्लामी आतंकवादाविषयीची भूमिका सौम्य असते. राज ठाकरे यांना अफझलपेक्षा महाभयंकर माणूस वाटतो, म्हणून शिवराज पाटील आणि शरद पवार यांनी तोंड उघडले पाहिजे आणि `नेहमी महाराष्ट्रावर अन्याय करत रहाण्याची भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने परवडणारी नाही’, असे त्यांनी सांगितले पाहिजे. बेळगावमध्ये ५० वर्षे मराठी माणसाचे खच्चीकरण चालू आहे. त्यावर लालू, पासू आणि मंडळी मौन बाळगून आहेत; पण मनसे कार्यकर्त्यांकडून दोनचार बिहारींना दोनचार थपडा खाव्या लागल्या की, आकाश कोसळल्यासारखे हे लोक गळा काढणार. महाराष्ट्राची बाजू सत्याची असूनही आरोपीच्या पिंजर्यात महाराष्ट्राला उभे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील असतांना या न्यायालयातून त्या न्यायालयात राजची नव्हे, तर महाराष्ट्राची फरपट चालली आहे. उत्तरप्रदेशात आणि बिहारमध्ये इमाम बुखारीला आणि इस्लामी आतंकवाद्यांना अटक करण्याची छाती स्थानिक पोलिसांना होत नाही. हिंदुत्ववाद्याची ससेहोलपट होत आहे. याचा विकृत आनंद महाराष्ट्रातील नेत्यांना होणे साहजिकच आहे.
- सुघोष
निगडीत वृत्त : शरसंधान
- सचिन आणि सावरकर ! : 2008-10-21
- नेहरू आणि नोबेल पारितोषिक : 2008-10-16
- मुग्धा आणि जीवनसंगीत : 2008-10-14
- मुखी असो द्यावे हरिनाम ! : 2008-10-07
- पळू नका, देव कुठे जात नाही ! : 2008-10-02
- लता मंगेशकर एक ऋषीतुल्य गायिका : 2008-09-30
- राजनाथ सिंग मातोश्रीवर : 2008-09-25
- आतंकवाद आणि मुलायमसिंग : 2008-09-23
- शिवराज, मदनलाल आणि जीना : 2008-09-18
- सलमानचा गणपति आणि फतवा : 2008-09-16