Advertisement

Friday, July 23, 2010

धर्मप्रबोधनाचा महामेरू : प.पू. डॉक्टर


सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी १९९७ साली घेतलेल्या `साधना आणि क्षात्रधर्म' या विषयांवरील १००हून अधिक जाहीर सभांचा काळ म्हणजे प.पू. डॉक्टरांची विविध रूपे पहाण्याचा, त्यांचा सहवास अनुभवण्याचा एक सुवर्णयोग होता. विविध घटनांतून अनुभवता आलेले प.पू. डॉक्टरांचे साधकांवरील निस्सीम प्रेम, साधकांची सेवा चुकांविरहित होण्यासाठीची त्यांची तळमळ, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे द्रष्टेपण आणि त्यांच्या प्रवचनामुळे भारावून कृतीसिद्ध होणारा समाज असे अनेकविध अनुभूतींचे भांडार या सभांच्या स्मरणात साठून राहिले आहे आज कालच्या लेखाचा पुढील भाग पाहू
संकलक : श्री. नागेश गाडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
उत्तरार्ध

३. जाहीर सभांद्वारे प.पू. डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन !
३ इ. साधकांच्या बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेणारे पितृतुल्य प.पू. डॉक्टर !
३ इ १. सभेच्या व्यासपिठाच्या साहित्याच्या टेम्पोसोबत ५-६ साधक नियमितपणे अनेक दिवस होते. या साधकांची प.पू. डॉक्टर आवर्जून विचारपूस करत. सभेच्या नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील स्थानिक साधकांना `व्यासपिठाच्या गाडीसोबत असणार्‍या साधकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था झाली आहे का', याविषयी विचारत.
३ इ २. प.पू. डॉक्टरांना अनेक साधक फळे, मिठाई देत. प.पू. डॉक्टर ही सर्व मिठाई आणि फळे गाडीसोबत असणार्‍या साधकांना भूक लागल्यावर काहीतरी खायला हवे; म्हणून देत असत.
३ इ ३. रत्‍नागिरी येथील सभा झाल्यानंतर पुढच्या सभेला दोन दिवसांचा अवधी होता. लागोपाठ सभा होत असल्यामुळे व्यासपिठाच्या सेवेतील साधकांना विश्रांती म्हणून प.पू. डॉक्टरांनी त्यांना गणपतीपुळयातील स्वयंभू गणपतीच्या दर्शनासाठी आणि समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी पाठवले. यासाठी त्यांनी स्वत:ची गाडी साधकांना दिली.
३ इ ४. कारवार येथील मुक्कामात व्यासपिठाच्या सेवेतील एक साधक ताप आल्यामुळे गाडीत झोपला होता. बाकीचे साधक प.पू. डॉक्टरांसमवेत थोड्या अंतरावर उभे राहून बोलत होते. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी `गाडीत कोण झोपले आहे ?', `का ?', अशी चौकशी केली. आजारी असल्यामुळे साधक झोपल्याचे समजल्यावर ते तात्काळ गाडीकडे चालत गेले. त्यांनी त्या साधकाची चौकशी केली आणि पुढील सेवा थांबवून त्यांनी त्या साधकासाठी त्यांचा मुक्काम असलेल्या घरातून औषधे आणून दिली.
३ इ ५. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुका हा एक अतीदुर्गम भाग. रहदारीच्या साधनांची न्यूनता असूनही देवगडच्या मुख्य रस्त्यापासून दूर असलेल्या गावातील साधक देवगड येथील सभेसाठी आले होते. ही सभा संपल्यानंतर ते घरी जाण्यास निघाले. प.पू. डॉक्टरही त्याच मुख्य रस्त्यावरून पुढील सभेच्या ठिकाणी जात होते. रस्त्यात प.पू. डॉक्टरांना हे साधक दिसल्यानंतर त्यांनी स्वत:ची गाडी थांबवली आणि या सर्व साधकांना त्यांनी गाडीत घेतले. त्या सर्व साधकांना गाडीत बसता यावे, यासाठी प.पू. डॉक्टर स्वत: अत्यंत दाटीवाटीने गाडीत बसले. त्या साधकांना त्यांच्या गावानजीक सोडल्यानंतर प.पू. डॉक्टर पुढील प्रवासाला निघाले.
साधकांना जोडून ठेवण्यात किंबहुना सनातन हे विशाल कुटुंब होण्यास प्रेमभाव हे मुख्य सूत्र आहे. हा प्रेमभाव प.पू. डॉक्टरांनी साधकांना कसा शिकवला, हे स्पष्ट करणारी ही वरील उदाहरणे आहेत.
३ ई. साधकांच्या सेवा त्रुटीविरहित व्हाव्यात, यासाठी प.पू. डॉक्टरांचे प्रयत्‍न !
३ ई १ सभेची पूर्वसिद्धता प.पू. डॉक्टरांनी जातीने पहाणे : सभा असलेल्या शहरातील साधकांकडे
प.पू. डॉक्टर थांबत आणि सभा चालू होण्याच्या वेळेपूर्वी १५-२० मिनिटे सभास्थळी येत. काही ठिकाणी सभेची सिद्धता चालू असतांना प.पू. डॉक्टर स्वत: सिद्धता पहाण्यासाठी येत आणि त्यामधे सुधारणा सुचवून रहाण्याच्या ठिकाणी परत जात असत. सभा संपल्यानंतर कोणी जिज्ञासू भेटण्यास आल्यास त्याला ते भेटत. त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देत आणि निवासाच्या ठिकाणी निघून जात.
३ ई २. सभेच्या आरंभापासूनच प.पू. डॉक्टरांकडून त्रुटींविषयी लिखाण होणे : प.पू. डॉक्टर सभास्थळी व्यासपिठावर आसनस्थ झाल्यानंतर सूत्रसंचालक कार्यक्रमाचा आरंभ करत असे. त्यानंतर प.पू. डॉक्टरांचा परिचय करून दिला जाई आणि प.पू. डॉक्टरांचे औक्षण करून त्यांच्या मार्गदर्शनाला प्रारंभ होत असे. या १०-१५ मिनिटांच्या अवधीत प.पू. डॉक्टर प्रदर्शन कक्ष, सभास्थळाची मांडणी इत्यादीच्या संदर्भात झालेल्या त्रुटी कागदावर लिहित असत आणि या त्रुटी प्रवचन संपवून निवासव्यवस्थेकडे जातांना व्यासपिठाच्या व्यवस्थापनाचे दायित्व असणार्‍या साधकाकडे देऊन जात. `या त्रुटी पुढच्या सभेत होणार नाहीत, याची काळजी घेतली जावी', हा त्यामागील उद्देश होता.
३ ई ३. सभेपूर्वी प.पू. डॉक्टरांकडून प्रदर्शन कक्षाची आवर्जून पहाणी ! : साधारणत: सर्व ठिकाणच्या प्रदर्शनाचे स्वरूप एकच होते. तरीही प.पू. डॉक्टर प्रत्येक ठिकाणचे प्रदर्शन पहात असत आणि त्यात काही त्रुटी राहिल्या असल्यास साधकांना त्या लिहून देत असत.
३ ई ४. सेवा परिपूर्ण व्हावी, यासाठी सभेनंतर साधकांच्या चुकांची होणारी बैठक ! : सभा झाल्यानंतर साधकांकडून सभेची सिद्धता करतांना झालेल्या चुकांची बैठक घेत आणि पुढच्या सभेत त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी त्या चुकांची माहिती पुढील सभेच्या ठिकाणी पाठवून देत. साधकांची सेवा परिपूर्ण व्हावी, याची तळमळ प.पू. डॉक्टरांनाच असे. ज्या ठिकाणी ते बैठकीसाठी उपस्थित राहू शकत, तेथे ते उपस्थित रहात अन्यथा तेथील दायित्व असणार्‍या साधकांना बैठक घ्यायला सांगत.
३ ई ५. सोसाट्याच्या वार्‍यात प्रदर्शनाची हानी होणार नाही, असे प्रदर्शन लावण्याविषयी प.पू. डॉक्टरांनी मार्गदर्शन करणे : साधकांना व्यासपिठाचे व्यवस्थापन शिकवण्याच्या दृष्टीने व्यासपिठाची सिद्धता चालू असतांनाच प.पू. डॉक्टर सभास्थळी आल्याची घटना गणपतीपुळे येथील सभेच्या वेळी घडली होती. सभास्थळ समुद्रकिनार्‍यावर असल्यामुळे सोसाट्याच्या वार्‍यात प्रदर्शनाचे तक्‍ते, व्यासपिठाच्या मागील पडदा उडत होता. अशा परिस्थितीत व्यासपीठ आणि प्रदर्शन कक्ष उभारण्याचा अनुभव कोणालाच नव्हता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे प्रसारसाहित्याची नासधूस होण्याची शक्यता होती; मात्र प.पू. डॉक्टरांनी स्वत: तिथे येऊन `अशा परिस्थितीत प्रदर्शन कसे लावावे', याविषयी आणि व्यासपिठाच्या उभारणीविषयी काही मौलिक सूचना दिल्या. त्यामुळे कोणतेही विघ्न न येता किंवा प्रसारसाहित्याची कोणतीही हानी न होता ती सभा झाली.
३ उ. शंभर सभांसाठी एक सदरा, एक विजार (पँट) परिधान करणे, हा प.पू. डॉक्टरांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय ! : या शंभर सभांसाठी प.पू. डॉक्टरांनी अवघा एक सदरा आणि एक विजार (पँट) वापरली. सभा संपल्यानंतर त्यांचा सदरा आणि विजार धुऊन सुकत घातली जात असे आणि दुसर्‍या दिवशी सभेपूर्वी तो इस्त्री करून परिधान केला जात असे. असे करण्यामागे प.पू. डॉक्टरांची दूरदृष्टी होती. प.पू. डॉक्टरांच्या सर्व ठिकाणच्या सभांचे ध्वनीचित्रीकरण होत असे. या सर्व सभांमधील चांगला भाग निवडून एक ध्वनीचित्रफीत सिद्ध करायची होती. प.पू. डॉक्टरांनी वेगवेगळे कपडे परिधान केले असते, तर अंतिम होणारी ध्वनीचित्रफीत चांगली वाटली नसती. म्हणून त्यांनी सर्वच्या सर्व सभा एक सदरा आणि एक विजार याच्यावरच केल्या.
४. जाहीर सभांच्या संदर्भातील अनुभूती
४ अ. `जेवढी कनात तितके लोक !' - प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वचनाची प्रचीती ! : जाहीर सभांचे व्यासपीठ उभारण्याच्या दृष्टीने चर्चा करत असतांना प.पू. डॉक्टर एकदा म्हणाले `जेवढी कनात बांधाल, तितके लोक येतील.' म्हणजे `साधक जितकी अपेक्षा ठेवतील, तितके लोक येतील', हा प.पू. डॉक्टरांच्या म्हणण्याचा भावार्थ होता.प.पू. डॉक्टरांच्या या आशीर्वचनाची प्रचीती पुढे सर्वच सभांमध्ये आली. बहुतांश सभांमध्ये जिज्ञासू मोठ्या संख्येने आल्यामुळे कनाती सोडून मैदान उघडे ठेवावे लागले. मात्र `अपेक्षेपेक्षा अल्प लोक आले', असे कधी झाले नाही.
रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या छोट्या शहरात प.पू. डॉक्टरांच्या सभेचे आयोजन केले होते. या शहराची लोकसंख्या, तेथे चालू असलेले त्या वेळचे सनातनचे प्रसारकार्य या सर्वांचा विचार करता प.पू. डॉक्टर म्हणाले `येथे व्यासपीठ आणि काही उभारायला नको. शंभर जिज्ञासू बसू शकतील, अशा एखाद्या ठिकाणी सभा घेऊया.' स्थूलमानाने विचार करता `प.पू. डॉक्टर सांगतात, ते बरोबर ! येथे शंभरपेक्षा अधिक लोक येणार नाहीत', असेच वाटत होते. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टरांनी पुन्हा नेहमीप्रमाणे व्यासपीठ उभारण्यास सांगितले. विशेष म्हणजे शंभर लोकांचीही अपेक्षा नसलेल्या या सभेला पाचशेहून अधिक जिज्ञासूंनी उपस्थिती लावली.
४ आ. १२ तासांच्या प्रयत्‍नांनंतर उभे रहाणारे व्यासपीठ एके ठिकाणी अवघ्या तीन घंट्यांत उभे राहिले ! : सभेसाठी व्यासपीठ, प्रदर्शन उभारण्याची सेवा करण्यास एरव्ही १२ घंटे लागत. सकाळी ५ वाजता चालू झालेली सेवा सभा सुरू होण्याच्या क्षणापर्यंत चालूच असे; मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत हीच सेवा अवघ्या तीन घंट्यांतही पूर्ण करण्याचे बळ साधकांमध्ये निर्माण होत असे. याचीही प्रचीती आली. काही अडचणींमुळे उडुपी (कर्नाटक) येथील सभास्थळी पोहोचण्यास व्यासपिठाचे साहित्य नेणार्‍या गाडीला विलंब झाला. सभेची वेळ सायंकाळी पाच वाजता आणि वाहन पोहोचले दुपारी एक वाजता. सभेच्या ठिकाणाची पाहणी, साधकांची जुळवाजुळव आदी करता-करता प्रत्यक्ष सेवा चालू व्हायला दुपारचे दोन वाजले. आश्चर्य म्हणजे ही सेवा सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्णही झाली. (एरव्हीच्या सभांमध्ये व्यासपीठ उभारावे लागत असे. येथे व्यासपीठ उभारावे लागले नाही; मात्र इतर सेवा इतक्या अल्पावधीत होणे, ही व्यासपीठ व्यवस्थेतील साधकांसाठी अनुभूती होती.)
४ इ. प.पू. डॉक्टरांच्या सभांवर वरुणराजाचीही कृपादृष्टी ! : रत्‍नागिरी जिल्ह्यात पाचल या आडवळणाच्या गावात प.पू. डॉक्टरांची सभा चालू होती. त्या वेळी व्यासपिठाच्या सेवेतील काही साधक सुमारे ५०० मीटर अंतरावर काही सेवेनिमित्त गेले होते. काही वेळ गेल्यानंतर तिथे पाऊस चालू झाल्यामुळे सभास्थळीचे प्रसारसाहित्य भिजून खराब होऊ नये, म्हणून ते साधक धावत-पळत सभेच्या ठिकाणी आले. सभास्थळी पोहोचल्यावर त्यांना आढळले की, तेथे पावसाचा एक थेंबही पडलेला नाही !
४ ई. साधकांना अनुभूती देणार्‍या जाहीर सभा ! : सभेत `साधना', हा विषय चालू असतांना बर्‍याच जणांना `नामजप चांगला होणे, ध्यान लागणे, प्रवचन ऐकून साधना करावीशी वाटणे', अशा अनुभूती येत. प.पू. डॉक्टरांच्या प्रवचनाच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूतींचे प्रमाण इतके मोठे होते की, सनातन-निर्मित `साधकांच्या अनुभूती' या ग्रंथातील पाचवे प्रकरण या अनुभूतींनीच व्यापले आहे.
५. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांचे काही वैशिष्ट्यपूर्ण परिणाम !
५ अ. सनातनच्या पुढील प्रसारकार्यासाठी उपयुक्‍त ठरणार्‍या निरनिराळया संकल्पनांचा उगम ! : प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा म्हणजे सनातनच्या पुढील काळात होणार्‍या व्यापक प्रसारकार्याची एक रंगीत तालीम होती. या सभांमध्ये प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्‍त ठरणार्‍या अनेक संकल्पनांचा उगम झाला. या संकल्पना पुढील काळात सनातनची ओळख बनून राहिल्या. `साधना आणि क्षात्रधर्म' असे लिहिलेला पिवळया रंगाचा झेंडा, सध्या सनातनचे साधक घालत असलेली पिवळी टोपी यांची निर्मिती या सभांच्या काळातच झाली. क्षात्रधर्म केलेल्या अवतारांच्या (श्रीराम, परशुराम, श्रीकृष्ण आणि मारुति यांच्या) चित्रांची निर्मिती याच सभांच्या निमित्ताने झाली आणि ती सभास्थानी लावली जात. व्यासपिठावर लावण्यात येणारे श्रीकृष्ण-अर्जुन असलेल्या रथाचे चित्रही त्या काळापासून वापरण्यात येऊ लागली. विशेष म्हणजे ही सर्व चित्रे प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी साधना म्हणून काढली होती.
५ आ. प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर उच्चभ्रूंनी त्वरित शारीरिक सेवेला प्रारंभ केला ! : मंगळुरू (कर्नाटक) येथील सभेला उच्चभ्रू जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पू. डॉक्टरांनी तेथील प्रवचनात साधनेअंतर्गन सत्सेवेचे महत्त्व सांगितले होते. या विषयाच्या अनुषंगाने सभेला उपस्थित असलेल्या बहुतांश उच्चभ्रू जिज्ञासूंनी स्वत:च्या मुलाबाळांसह सभेनंतरचे साहित्य `सत्सेवा' म्हणून आवरले.
६. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभांची प्रसिद्धीमाध्यमांकडून दखल नाही !
एरव्ही एखाद्या राजकारण्याने काहीही दायित्वशून्य वक्‍तव्य केले किंवा राजकीय कागाळया काढल्या की, त्याचे भले मोठे वृत्त देणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांनी प.पू. डॉक्टरांनी जाहीर सभांच्या माध्यमातून केलेल्या राष्ट्र आणि धर्म हिताच्या या कार्याची दखलही घेतली नाही. प.पू. डॉक्टरांच्या सभांना सहस्रावधी जिज्ञासू येत. तरीही काही अपवाद वगळता प्रसिद्धीमाध्यमांना `या कार्यक्रमांची दखल घ्यावी', असे वाटले नाही. `वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळा' या मारुतिरायाच्या वर्णनाप्रमाणे सनातनही मोठी होईल, याचे भय प्रसिद्धीमाध्यमांना तेव्हापासूनच वाटायला लागले होते आणि त्याबरोबर त्यांचा सनातनद्वेषही वाढत गेला, असे म्हणायला आता हरकत नाही.
(या लेखाच्या संकलनासाठी प.पू. डॉक्टरांच्या सभांच्या व्यासपिठाच्या नियोजनात सहभागी झालेले श्री. दिनेश शिंदे आणि श्री. श्याम गोवेकर यांचे अमोल सहकार्य लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञता !)

प.पू.डॉक्टरांच्या सभांच्या संदर्भात अशा प्रकारचे उद्बोधक अनुभव अजून कोणाला आले असतील, तर त्यांनी ते panveldainik@gmail.com या पत्त्यावर पाठवणे

No comments:

Post a Comment