Advertisement

Sunday, June 28, 2009

मुलीना सुसंस्कारीत करा !

३ जून रोजी सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या `हिंदु रणरागिणी' या महिलांच्या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी प्रवचनकार व सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्‍त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मुलींवर चांगले संस्कार होणे कसे आवश्यक आहे़. सुसंस्कारीत माताच चांगला बालक घडवू शकते व घर चांगले करू शकते, याविषयी स्पष्ट केलेली परखड मते त्यांच्याच शब्दांत पाहूया.

आई चांगली झाली पाहिजे !
घरातली आई चांगली पाहिजे. आई धर्माचे रक्षण करणारी हवी आहे. आई म्हणजे काही नटी आहे, नटून हिंडायला ? जी खरी नाही, ती नखरे करते. आम्हाला आई चांगली हवी आहे. घराघरातली आई जर चांगली असेल, तर धर्मसंकटाची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. माझं पोर अन् पोर हिंदु धर्माचे रक्षण करेल. बाळ जन्माला आल्यानंतर पहिला श्‍वास घेत त्याला हृदयाशी लावाल, त्या वेळला त्याला सांगा ``बाळा, या परम पूजनीय अशा भारतभूमीवर तू `हिंदू' म्हणून जन्माला आलेला आहेस !''
हल्ली लहानपणापासून एकच गोष्ट आई-वडील सांगतात, `तुला चांगले शिकायचे आहे. तुला डॉक्टर व्हायचे आहे, तुला इंजिनिअर व्हायचे आहे, करीअर करायचे आहे. तुला अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हायचे आहे.' हे सांगता येत नाही का की, ``तुला सृजनशील माणूस व्हायचे आहे आणि `धर्माभिमानी हिंदु व्हायचे आहे !''

सुकन्या, सुगृहिणी, सुपत्‍नी, सुमाता !
आज काय आहे घराची परिस्थिती ? काय आहे मुलींची परिस्थिती ? अहो, जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला सांगितले, ``तू या चार भिंतींचा विश्‍वास आहेस. तू आमच्या दोघांची प्रतिष्ठा आहेस. तू `सुकन्या' असली पाहिजेस. ज्या वेळेला तुझ्या डोक्यावर अक्षता टाकून मी तुला दुसर्‍याच्या घरात पाठवीन, त्या वेळेला तू त्या घराची प्रतिष्ठा आहेस. त्या वेळला तू `सुगृहिणी' असली पाहिजेस. तू ज्याच्याशी लग्न करणार आहेस आणि जो तुझा नवरा आहे, हे शिवशक्‍तीचं मिलन म्हणजे संसार आहे, तर तू `चांगली पत्‍नी' असली पाहिजेस आणि ज्या वेळेला तुला बाळ होईल, तेव्हा ते गुणवंत बनवणारी तु `सुमाता' असली पाहिजेस !'' आपल्या मुलींना केवळ पैसा मिळवणारी यंत्र बनवू नका.

भाकरी करता आली पाहिजे !
आईने आणखी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली होती की, `तू डॉक्टर हो, इंजिनिअर हो, वकील हो, कुठल्याही क्षेत्रात जा. अंतराळात जा, नाहीतर पाताळात जा, भाकरी करता आली पाहिजे !' सुगरण असले पाहिजे. पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मुलगी सुगरण असली पाहिजे. सांगा, इथे बसलेल्या आयांनो, दहावीपासून मुली हॉस्टेलला घालत आहात. त्यांच्यापुढे हॉस्टेलचे आयते ताट येते. नवर्‍याला आयते ताट देणार का त्या मुली ? सांगा हे कुठले धर्माचरण आहे ?

`ब्युटीपार्लर'ने धर्म ओढून नेला !
सगळे धर्म सांभाळता आले पाहिजेत. पतीधर्म सांभाळता आला पाहिजे. आईने मुलीच्या संसारात लक्ष घालायला नको. कुठे चाललो आहोत आपण ? सगळया आईंनी मिळून विचार करा या गोष्टीचा. लग्नामध्ये पाच-पाच लाख रुपये खर्च करतात. गौरीहर पूजायला वेळ नाही. परवा माझ्या भाचीच्या लग्नात `ब्युटीपार्लर'वाली येऊन उभी राहिली आणि म्हणते `पटपट आवरा.' मी म्हटले, ``हे बघ, गौरीहर पूजल्याशिवाय शालू नेसायला माझी भाची येणार नाही.'' ती म्हणाली, ``... मग ते'', मी म्हटले, ``राहू दे ! आहे त्या साडीवर तिचे लग्न मी लावेन. गौरीहर पहिल्यांदा पूजू दे. म्हणू दे की, `मी ज्या नवर्‍यावर बरोबर लग्न करणार आहे, त्याची सुखं माझी आहेत, त्याची दु:ख माझी आहेत.'' काय या `ब्युटीपार्लर'च थैमान ? आपला सगळा धर्म यांनी आढून नेला.

दिसण्यापेक्षा आचार-विचार महत्त्वाचे !
परवा एका `ब्युटीपार्लर'चे उद्घाटन होते. त्या उद्घाटनाला एका बाईने मला बोलावले. मला आश्चर्य वाटले. पहिला प्रश्‍न विचारला, ``चेहरा सुंदर करण्यासाठी किती पैसे लागतात ?'' बायकांचे लगेच उत्तर, ``१०० पासून ५०० रुपयांपर्यंत.'' म्हटलं, ``चेहरा स्वच्छ करायला जर इतके पैसे लागतात. तर आंतरमन सुंदर करून ते धर्माभिमानी करायला किती पैसे लागतील ? मी मनाचे ब्युटीपार्लर सुरू केले आहे. ज्यांना यायचं आहे त्यांनी या. माझ्याकडे मन सुंदर करून मिळेल. शुल्क स्वीकारले जात नाही !'' शिकवा मुलींना, सांगा मुलींना, दिसण्यापेक्षा तुमच्या असण्याला जास्त महत्त्व आहे. दिसणं महत्त्वाचं नाही. सगळयांत जास्त आचार, विचार, आहार, विहार या चार गोष्टींचा विचार करा. ते सगळयात महत्त्वाचं आहे. आता आचार काय आहे ? काय कपडे घालतो आपण ? काय पोशाख करतो आपण ? आपण हिंदु सनातन तरुणी आहोत. भारतीय संस्कृतीतील आहोत. सूर्याचे तेज माझ्या कुंकवावर आहे. ऐश्‍वर्याचा पदर मला लाभलाय. हातातल्या बांगड्या उत्तरदायित्वाची जाणीव मला करून देतात. पायातली जोडवी मला घर जोडायला शिकवतात. अशी मी भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे, सांगा मुलींना.

जीन्स पँट घालून पुरुष होता येत नाही !
ठणकावून सांगा सगळयांना. फक्‍त बायकांचा दोष आहे असे नाही, तर पुरुषांनाही मी ठणकावून सांगते, जीन्स पॅन्ट घालून वावरणार्‍या घरातल्या तुमच्या मुलीला चार फटके मारा. जीन्स पँट घालायला पैसे देणार्‍या बायकोजवळ पैसे द्यायचे नाहीत आणि बायकांनो तुमच्याजवळ पैसे असतील, तर जीन्स पँन्टवर खर्च करायचे नाहीत. जीन्स पँट घालून पुरुष होता येत नाही !

स्त्री शक्‍ती महत्त्वाची आहे, मुक्‍ती नाही !
स्त्री मुक्‍तीवाल्यांनी तुमच्या डोक्यात काहीतरी खुळ घातलय. `स्त्री शक्‍ती' महत्त्वाची आहे, `स्त्री मुक्‍ती' नाही. आणि हा कसला खेळ ? म्हणे `चूल आणि मूल या जोखडातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे.' एक प्रश्‍न मी सगळया बायकांना विचारते, ``स्वयंपाकघरात गेल्याशिवाय चैन पडतं ? मग या स्त्री मुक्‍तीवाल्या बायका तुम्हाला कोणत्या चुलीतून बाहेर काढणार आहेत ?'' आणि लेकराचा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडतं ? कारण भारतीय संस्कृतीमध्ये मातृत्व महत्त्वाच आहे. अहो, कशासाठी दिलयं हे सगळं, कशासाठी मातृत्व ? कशासाठी ही आतली कोख ? काय आपण डोक्यात खुळ घेऊन फिरतो ?

स्त्रीत्वाच बलिदान देऊन स्त्री मुक्‍ती नको !
सगळया स्त्री मुक्‍तीवाल्या बायकांना सांगा, ``आम्ही सगळया कार्यक्षेत्रात जायला तयार आहोत. पण आमच स्त्रीत्व जपून जाणार आहोत !'' आपल्या स्त्रीत्वाच कुठेही आम्ही बलिदान देणार नाही आणि आम्हाला ते चालणार नाही. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला शिक्षणाच रान मोकळं करून दिलं. सावित्रीबाई फुले एवढ्या शिकल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या; पण डोक्यावरचा पदर कधी बाईचा खाली आला नाही. कपाळावर नवर्‍याच्या नावाची लावलेली चीर नवरा असेपर्यंत कधीही पुसली गेली नाही. दोन वाट्या ज्या जाड्या पोटलीत गुंफलेल्या होत्या, त्या कधी काढून टाकल्या नाहीत. पायातल्या जोडव्यांनी तीला संपूर्ण समाज जोडायला शिकवला. ज्योतीबांनी सांगितले म्हणून त्या शिकल्या, पोरींची शाळा काढली, मुलाला सांभाळलं आणि त्यांच्या खांद्याला खांादा लावून सत्यशोधक समाजाचं कामही केलं. सावित्री नवर्‍याशी एकरूप झाली होती. सावित्रींना आदर्श मानणार्‍या स्त्री मुक्‍तीवाल्यांना हे लक्षात येईल का ?

भारतीय संस्कृतीने दिलेलं `स्पर्शातलं अंतर' जपायला हवं !
एक गोष्ट प्रामुख्याने मुलींना सांगा, जे स्पर्शातलं अंतर भारतीय संस्कृतीने सांगितले आहे, ते शाबूत ठेवायला सांगा. आता ताईंनी सांगितलं की, `शेकहँड' करू नका. मी तर पुढे जाऊन सांगते, मी चौदा वर्षांची झाले, तेव्हा माझ्या आईने मला सांगितल होत की, आता तू मोठी झालेली आहेस. घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा, तुझा भाऊ भावाकडे येणारे मित्र सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला हात लावायचा नाही. मला आठवतय, वडिलांनी एकदा मला फक्‍त ताप असतांना कपाळाला जो हात लावला, त्याने मला अस वाटलं की, परमेश्‍वराने आपल्याला स्पर्श केला आहे. आणि दुसरा स्पर्श वडील गेले, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला तेव्हा केला तो स्पर्श. आज वडील जाऊन चोवीस वर्ष झाली तेवढीच अलोट श्रद्धा आहे, तेवढच प्रेम आहे. `पप्पा..' म्हणून एवढ्या मोठ्या-मोठ्या मुली गळयात पडतात. हे कसं चालंत ? ते फक्‍त चित्रपटात असतं. मोठ्या मुली वर कपडे कसले घालतात आणि तशा जाऊन वडिलांना मिठ्या मारतात. असले काही फाजील आणि बावळट प्रेम नको. आपली संस्कृती त्यागाची आहे, भोगाची नाही. आपली संस्कृती योगाची आहे. हे मुलींना सांगा. कुणालाही हात धरून `शेकहँड' करतात. काय चाललय ? अंतर ठेवून प्रेम करा. आपल्याकडे अंतराला जास्त महत्त्व आहे हे लक्षात ठेवा. व्यासपिठावर जेव्हा सगळे पाहुणे पुरुष असतील, तेव्हा मुलींनो, अतीआत्मविश्‍वासाने जाऊन `शेकहँड' करू नका.

भारतीय पोषाखाचाच आग्रह धरा !
आम्हाला घरातली आई सतर्क हवी. पण बदलेले युग. बदललेली आमची आई नऊवारीतून पाचवारीत आली. आम्ही म्हटले ठीक आहे, पाचवारी तर नेसायला लागली. पाचवारीतून चुडीदारवर आली. आम्ही म्हटले `ओके.' चुडीदारवर ओढणी घे बाई. चुडीदारमधून गाऊनवर हिंडायला लागली. `नॉट ओके.' भाजी आणायला जात आहेत रस्त्यापर्यंत ओढण्या न घेता आता सगळया मुली. जणू सांगतात, `हा भारतीय स्त्रीचा देह आहे, हा दाखवण्यासाठीच आहे !' आईला लाज वाटली पाहिजे, मुलींना कपडे असे घेतात ते. जीन्स पँट पण घालायची, एवढेसे कमरेपर्यंत `शॉट टॉप' घालायचे. अत्याचार होतील नाहीतर काय होतील ?

शिक्षणाने स्त्रीत्व संपत चाललं आहे !
आज इतक्या मुली घरातून पळून जात आहेत, आई-वडिलांच्या हृदयावर पाय ठेवून. बांधता येत नाही ? कुणी केले संस्कार ? का बांधता येत नाहीत मुली ? खरे तर एक वाक्य मी तुम्हाला बोलेन. तुम्हाला राग येईल कदाचीत आज अशी परिस्थिती आहे की, जास्त शिकवल्यामुळे आणि नोकरी करण्यामुळे बायका पुरुषी झाल्या आहेत. स्त्रीत्व सगळ संपलं. आम्हाला आमची छान होती घरात बसणारी. सरकार उगीचच म्हणते `अडाणी आई घर वाया जाई.' अरे, अडाण्या आईने घर राखलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो ! शिकलेली आई रोज बाहेरचे पदार्थ आणते आणि खायला घालते. `इस्टंट फूड !', `मॅगी टू मिनिट !' अरे, `भाकरी टू मिनिट करून दाखवा !'

निसर्गावर मात करून स्त्री-पुरुष समानता कशी येईल ?
यासाठी सांगते आहे, घराघरातून हे सगळ जागृत झाले पाहिजे. पुरुषांनो, तुमच्या बाजूने एकही कायदा नाही याची मला वकील म्हणून जाणीव आहे. तरीसुद्धा तुम्ही घरात जरासे कडक व्हा. गाऊन घालून जाणार्‍या बायकोला तुम्हीच रस्त्यापर्यंत जायचे नाही म्हणून रागवा. पूर्वी आमचे वडील असायचे त्यांचे पाय जरासे वाजले तरी आम्ही घाबरायचो. आज तुम्ही अख्खे घरात येता तुम्हाला कोणी घाबरतेय ? तुमची पत काय झाली ते बघा आधी. सगळे पुरुष कडक व्हायला पाहिजेत. आज पुरुष स्वयंपाक करतात. करू देत, हरकत नाही. बरोबरीने करायचं ठीक आहे. पण मला सांगा स्त्री आणि पुरुष समानता होऊ शकते ? निसर्गावर मात करायला जाऊ नका. निसर्ग आपले बरोबर दाखवत असतो. निसर्गाने बायकांना दुबळेपणा दिलेला आहे आणि तो मान्य करण्यात काय कमीपणा आहे ?

1 comment:

  1. Aie apan sangitalale vichar Mala patale. Aj aie shabd jaun Mummi cha chalan vadhat ahe. Apli bharatiya sanskruti visarun marathi muli guruwari suddha chicken ani matam khayala kuthe tari dur chaya dhabayavar Muslim mulasobat jatat. Tithe jaun Bear pitat. Nako te Krutta kartat.
    Yanche Mai bap ya mulina Kai paida karun fakt sodun detat ki kai. ani vartun sangatat myaza mulita ticha boyfriend khup prem karto. Asa mulila kathor sachan zalech palije.

    amol thakr, Nagpur

    ReplyDelete