बराक ओबामा हे अमेरिकेचे ४२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर पाच दिवस उलटून गेले. अमेरिकेतील ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक म्हणून जगभर गाजली. बराक ओबामा हे तेथील निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून प्रसिद्धीच्या झोतातच राहिले आणि चार नोव्हेंबर रोजी अमेरिकी जनतेने ओबामा यांच्या नेतृत्व निवडीवर शिक्कामोर्तब केले. त्यांची लोकप्रियता केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभर पसरली असल्यामुळे अद्यापही त्यांच्याविषयीच्या बातम्या ठळकपणे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होतच आहेत.
जगातील मोठी लोकशाही आणि मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचा अध्यक्ष निवडला गेला, याचा हर्ष प्रसिद्धीमाध्यमे लपवू शकली नाहीत, एवढे म्हणता येत असले, तरी या नेत्यांच्या बरोबर आपल्या राजकीय नेत्यांची तुलना करण्याचा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. बराक ओबामा यांनी गेल्या दीड वर्षापासून त्यांचा निवडणूक प्रचार सुरू ठेवला होता. त्या प्रचाराच्या काळात त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणखी एक उमेदवार असलेल्या हिलरी क्लिंटन यांना त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, हा त्यांचा पहिला विजय होता. केवळ वक्तव्यांच्या फवार्यांनी समोरच्या व्यक्तीला नामोहरम करण्याचे सामर्थ्य ओबामा यांच्यात होते. आपल्या देशात अशा प्रकारे विरोधकाला जेरीस आणण्याची किमया करणारे लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी कितीसे आहेत ? अमेरिकेसारखी सुसंस्कृत लोकशाही आता आपल्या देशात नाही, हे पटवून देण्यासाठी शेकडो उदाहरणे सांगता येतील. समाजवादी पक्षाचे खासदार अनीस अहमद, राजदचे खासदार पप्पू यादव, लोकजनशक्ती पक्षाचे खासदार सूरजभान आणि राजदचे खासदार शहाबुद्दीन यांच्यावर जे खुनाचे आरोप आहेत, ते याच लोकशाहीतील आहेत. आपल्या देशातील नेत्यांच्या भोवती सुरक्षाव्यवस्थेचे जे कडे पहायला मिळते, तसे बराक ओबामा यांच्या भोवती कधी दिसले नाही. त्यामुळे त्यांना एका खुनी हल्ल्यालाही सामोरे जावे लागले, हे ऐकून जगभरातील लोक अस्वस्थ झाले. या सगळया गोष्टींचा ऊहापोह करावासा वाटतो, त्यामागील कारण म्हणजे ओबामा यांच्याविषयी वाटणारा विश्वास. सध्या जगभर आर्थिक मंदीचे वातावरण असून त्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे. आर्थिक मंदी ही बाबच अशी आहे की, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तीन तीन वर्षांचा कालावधी जातो, असा आजपर्यंतच्या आर्थिक मंदी कालावधींविषयीचा अनुभव आहे. त्यामुळे ओबामा यांच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे, असे जगभरातील अर्थतज्ञ आणि राजनीतीज्ञ म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर बराक ओबामा हे एक आदराचे स्थान आहे, असे म्हणायला हरकत नाही.
परिश्रम आणि मिंधेपणा !
अमेरिकेतील डेमोक्रॅटिक आणि रिपब्लीकन या दोन प्रमुख पक्षांनी आजपर्यंत त्या देशात राजवट चालवली आहे. राजनीतीच्या दृष्टीने विचार करता डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारकडून भारताला झुकते माप मिळते, तर रिपब्लीकन सरकार पाकधार्जिणे असते. बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे असल्यामुळे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण त्याचा कसा लाभ घेणार, हे पहायचे आहे. जागतिक अर्र्थव्यवस्थेचे जवळपास तीनतेरा वाजलेले असले, तरी अमेरिका व पाश्चात्त्य देश पुढाकार घेऊन या मंदीवर मात करू शकतात. बराक ओबामा यांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली आहे आणि त्यांना अमेरिकेचा कारभार हाती घेण्यासाठी अद्याप शंभर दिवसांचा अवधी बाकी असला, तरी आजपासून त्यांनी त्यांच्या नियोजनाचे आराखडे तयार करायला सुरुवातही केली आहे. अविरत परिश्रम ही त्यांच्या यशाची किल्ली म्हणायला हवी. केवळ चार दिवसांच्या कालावधीत त्यांनी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी १७ सदस्यांची उच्चस्तरीय सल्लागार समिती स्थापन केली. ही तत्परता आणि तळमळ आपल्या देशातील नेत्यांमध्ये नाही; म्हणून ओबामा यांचे गुणगान सर्वत्र होतांना दिसत आहे. प्रचाराच्या काळात ओबामा यांनी जागतिक परिस्थितीवर बोलतांना पाकला दिलेला सल्ला भारतीय राजकारण्यांना दिलासा देणारा आहे. पाकला भारतापासून धोका नसून पाकमधील दहशतवादापासून तो आहे. पाकला दिला जाणारा मदतनिधी दारिद्र्य निर्मूलनासाठी न वापरता शस्त्रास्त्रे गोळा करण्यावर खर्च केला जातो, हे लक्षात आले आहे, असे ओबामा म्हणाले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांचे वक्तव्य सध्याच्या काँग्रेस सरकारला सुखावणारे वाटते. सामर्थ्यहीन असल्यावर त्याहून वेगळे ते काय होणार ? ही लाचार वृत्ती सोडून शत्रूला वठणीवर आणणारे सरकार देशाला लाभण्यासाठी आता वैचारिक क्रांतीच हवी !
No comments:
Post a Comment