Advertisement

Thursday, November 6, 2008

हिंदुसंघटनाचे कारण ठरलेला विश्‍वशांती महायज्ञ !

महायज्ञाबाबत दिशाभूल करणार्‍या प्रसारमाध्यमांवर बहिष्कार टाकून त्यांना वास्तववादी वृत्त देण्यास भाग पाडा !

कोल्हापूर येथे २ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत `१०८ पद्मकुंडीय श्री अष्टलक्ष्मी महायज्ञ' होत आहे. विश्‍वकल्याणासाठी होणार्‍या या यज्ञाला तथाकथित पुरोगामी व विज्ञानवादी मंडळींनी विरोध केला. त्यामुळे या यज्ञाची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात झाली. यज्ञाच्या माध्यमातून अन्नधान्याची नासाडी होते, अंधश्रद्धा पसरते, असे कांगावे करण्यात आले.

कोपरा सभा, धरणे आंदोलन, जाहीर सभा, मोर्चा व `बंद' अशी आंदोलने करण्यात आली असून आता दररोज धरणे धरण्यात येत आहेत. सुरुवातीला यज्ञाच्या समर्थनार्थ अनेकांनी छुपा पाठिंबा दर्शवला; मात्र समोर येण्याचे धाडस कोणत्याही संघटनेने दाखवले नाही. अशा वेळी `दैनिक सनातन प्रभात'ने यज्ञाच्या समर्थनाची सडेतोड भूमिका मांडत शास्त्रीय विवेचनातून प्रबोधन केले. त्यानंतर यज्ञाचे आयोजक आचार्य रामकुंडलजी महाराज शुक्ल यांच्या बाजूने भाजपचे आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. रामभाऊ चव्हाण यांच्यासह हिंदुत्ववादी उभे राहिले आणि हिंदूंच्या एकतेचा हुंकार धर्मद्रोह्यांच्या पाचावर धारण बसणारा ठरला.

हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांवर बहिष्कार टाका !
या यज्ञाच्या निमित्ताने काही प्रसारमाध्यमांनी मात्र केवळ यज्ञाच्या विरोधात भुई धोपाटण्याचा प्रकार केला. यज्ञाशी संबंधित अगदी मैदानावरील खड्ड्यांपासून पावतीपुस्तकांच्या छपाईत झालेल्या चुकांचे भांडवल करण्यात आले. बेकायदेशीरपणे `बंद' पुकारला असतांना नागरिकांच्या मनात भीती उत्पन्न करणारी आव्हाने दर्शनी पानांवर प्रसिद्ध करून हिंदूंचीही दिशाभूल करण्यात आली. विश्‍वशांती यज्ञाच्या निमित्ताने अशांती पसरवली जात असल्याचा `टाहो' फोडला. खरे तर विरोधाच्या आंदोलनांमधूनच दरवेळी हिंदुविरोधी गरळओक करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्‍न केला जात होता. आचार्यजींनी महायज्ञाबाबत शंकानिरसन करणारी उत्तरे दिलेली असतांना त्या उत्तरांचा विपर्यास करत पुन्हा असंतोष पसरवण्याचा प्रयत्‍न झाला. प्रत्यक्षात त्याचा परिणाम हिंदूंच्या जागृतीत झाला. हिंदूंनी जागृत होऊन प्रसंगी सामूहिक बहिष्कारासारखी अस्त्रे वापरून अशा प्रसारमाध्यमांवर वास्तववादी वृत्त पोहोचवण्यासाठी उद्युक्‍त केले पाहिजे.

प्रशासकीय दोन खात्यांच्या परस्परविरोधी भूमिका !
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी घेतलेली समन्वयाची भूमिका प्रथमच महत्त्वाची ठरली. पोलीस निरीक्षक श्री. संजय कुरुंदकर प्रत्येक वेळी प्रसंगावधान राखत निर्णय घेतले. यज्ञाच्या मैदानाच्या भोवताली कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली. यज्ञ समर्थक व विरोधक यानंा समोरासमोर येऊ दिले नाही. याउलट जिल्हा प्रशासनाने मात्र यज्ञाच्या परवानगीबाबत खेळखंडोबा केला. एकदा स्वत: बोलवलेल्या बैठकीला जिल्हाधिकारीच अनुपस्थित राहिले. सुरुवातीला प्रशासनाने यज्ञासाठी परवानगी असल्याचे जाहीर करून नंतर परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले. महापालिकेने मैदानाची परवानगी दिली, महापौर श्री. उदय साळोखे यांनी महायज्ञ यशस्वी करण्याचे आवाहन केले; मात्र विरोधकांनी जोर धरताच अंग काढून घेतले. महापालिकेच्या परवानगीवरच जिल्हाधिकार्‍यांनी बोट ठेवले, त्यामुळे प्रशासनाची मध्यस्थीची भूमिका केवळ वरपांगी ठरली, त्यातून काहीच साध्य झाले नाही.

महायज्ञाची हिंदुसंघटनाच्या दृष्टीने जमेची बाजू !
या महायज्ञाच्या समर्थनार्थ उभे ठाकलेल्या हिंदूंनी `हिंदू एकदा जागृत झाले, तर ते कोणत्याही धर्मद्रोहाला जुमानत नाहीत', हे पुन्हा एकदा दाखवून दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी केवळ खासदार श्री. सदाशिवराव मंडलिक वगळता, कोणीही धर्मद्रोह्यांना साथ दिली नाही. श्री. मंडलिक निवडणुकीला उभे रहाणार नसल्याने त्यांना या आंदोलनात फारसे गमावण्यासारखे काही नव्हते; मात्र या विरोधाने पक्षातील त्यांची खालावलेली पत आणखी घसरली. आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अभ्यासू व कुशल संघटनकौशल्य असणार्‍या नेतृत्वामुळे हिंदुत्ववादी चळवळीत एक नवा उत्साह निर्माण झाला. महायज्ञाबाबत सर्वसामान्यांना असणार्‍या शंकांचे निरसन या विरोधाच्या निमित्ताने पू. नंदगिरी महाराज व आचार्यजी यांनी प्रसिद्धीमाध्यमांसमोर केले. `धर्मविषयक अज्ञानामुळेच विरोध झाल्याने शासनाने हिंदूंच्या धर्मशिक्षणाची व्यवस्था करावी', अशी मागणी आचार्य रामकुंडलजी महाराज यांनी केली आहे.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाची सोय स्वत:च करा !
या विरोधातून सर्वत्रच्या हिंदूंनी एक महत्त्वाचा धडा शिकणे आवश्यक आहे. आज हिंदु धर्माच्या विरोधकांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी आपली श्रद्धास्थाने, संस्कृती आणि पर्यायाने राष्ट्र व आपले जीवन वाचवायचे असेल, तर धर्मशिक्षण घेण्यासाठी पर्याय उरलेला नाही. हे धर्मशिक्षण निधर्मी म्हणवण्यात स्वारस्य मानणारे राज्यकर्ते कधीच शिक्षणप्रणालीतून लागू करणार नाहीत. त्यामुळे हिंदूंच्या धर्मशिक्षणाची सोय हिंदूंनाच करावी लागणार आहे. या धर्मशिक्षण वर्गांतून निर्माण झालेल्या धर्माचरणी समाजात अशा प्रकारचे वाद निर्माण होणार नाहीत आणि खर्‍या अर्थाने विश्‍वशांतीला सुरुवात होईल !

|

निगडीत वृत्त : याबाबत बलाढ्य हिंदुत्त्ववादी संघटना काय करणार आहेत?