Advertisement

Showing posts with label Shri. Arvind Vitthal Kulkarni. Show all posts
Showing posts with label Shri. Arvind Vitthal Kulkarni. Show all posts

Sunday, June 28, 2009

स्त्री धर्म व पु.भा. भावे

दहा उपाध्यायांच्या तुलनेत एक आचार्य श्रेष्ठ. शंभर आचार्यांपेक्षा पिता श्रेष्ठ व सहस्र पित्यांच्या तुलनेत एक माता श्रेष्ठ आहे.

स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. अशा प्रकारे स्त्रीची महती सांगणार्‍या या थोर साहित्यिकाचे `स्त्री धर्म'विषयीचे विचार येथे देत आहोत.
स्त्री धर्माचा गांभिर्याने विचार
स्त्री धर्माचा विचार साहित्यिकांमध्ये पुरुषोत्तम भास्कर भावे यांनी गांभिर्याने, तळमळीने आणि सामर्थ्याने केला तसा आणखी काही मोठ्या लेखकांनी केला असता, तर तस्लीमा नसरीन यांना आश्रय मागायला आल्या असतांना भारतातून हाकलून देण्याचे माजोरीपण सरकारला दाखविता आले नसते. भावे यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. ते साजरे करण्यात स्त्रियांनी विषेशत्वाने पुढाकार घ्यायला हवा. भाव्यांनी तेवढे त्यांच्यासाठी निश्चितपणे केले आहे. मोहनदास गांधींनी देशाचे दोन तुकडे होतांना सोयिस्करपणे डोळे मिटून घेतले, तेव्हा अवघे आकाश हिंदु स्त्रियांच्या आक्रंदनाने ओले झाले होते. ते आर्त स्वर ज्या अगदी मोजक्या लोकांना ऐकू आले, त्यात भावे होते. सावरकरांना त्या किंकाळया ऐकू आल्या. मुंज्यांना ऐकू आल्या. हेडगेवारांना त्या किंकाळया ऐकून मरणप्राय यातना झाल्या. भावे तरुण होते. अशा वेळी शिवाजीचा मावळा जसा वागला असता, तसे भावे यांचे आचरण झाले. ते तडक नौखालीत पोहोचले. तेथे त्यांनी अपमानीत हिंदु भगिनींची प्रत्यक्ष भेट घेतली. विचारपूस केली. द्रौपदीच्या मोकळया केसांची जशी कृष्णाला कधीही विस्मृती झाली नाही, तसे जिहादी प्रवृत्तीने हिंदु स्त्रियांशी जे बीभत्स वर्तन केले, ते महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. असे वचन या पुरुषोत्तमाने त्यांना दिले. हे अत्याचार अनुत्तरीत राहू देणे म्हणजे त्या पापात वाटेकरी होणे होय, हे भावे मानीत होते. म्हणून एकेका हिंदु स्त्रीने बंगालमध्ये काय भोगले आहे, ते महाराष्ट्राला कळवण्याचे काम या सहृदय सारस्वताने केले. ``रक्‍त आणि अश्रू'' हा निबंधसंग्रह आणि ``नौका'' हा कथासंग्रह साक्ष आहेत.
तिसर्‍या पिढीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीकार अशा शब्दात भावे यांचा गौरव ना.सी. फडके यांनी केला आहे. आधुनिक मराठी नवकथेच्या चार शिल्पकारांपैकी एक भावे आहेत. ते भाषाप्रभु आहेत. भावे यांच्या लेखणीतून आपण अवतीर्ण व्हावे, असे शब्दांना वाटत असावे, इतकी त्यांची झुंबड भावे यांनी लेखणीला हात लावला की होते. अशा या लेखकाच्या स्त्री विषयक मतांनी मराठी साहित्यात एक तेजस्वी परंपरा निर्माण केली आहे.

स्त्रीला शक्‍ती देणारे भावे यांचे लिखाण
भावे यांचे व्यक्‍तिमत्त्व एकसंध आहे. ते विघटन सहन करू शकत नाही. म्हणून स्त्रीच्या मानमर्यादांना ते अतिशय हळूवारपणे आणि साक्षेपाने जपतात. भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते शुचिर्भूत नाही, हे सांगण्याचे धाडस भावे करतात. ते आपले पवित्र आणि प्रथम कर्तव्य आहे, असे भावे यांना वाटते. शत्रूच्या रक्‍ताचे सिंचन करून स्वातंत्र्य मिळवण्याची जगरहाटी आहे. या विषयावर सावरकर आणि गांधी अशा दोन गटांत भारताचे राजकारण स्पष्टपणे विभागले गेले आहे. `शत्रूचे रक्‍त सांडणार नाही', अशी शपथ गांधींनी हिंदूंना घ्यावयास लावल्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्याच्या सोहळयाला त्यांच्या स्त्रियांच्या करूण आणि केविलवाण्या किंकाळयांचे पार्श्‍वसंगीत लाभले. स्त्री भयमुक्‍त आणि मानार्ह होत नाही, तोपर्यंत भारतीय स्वातंत्र्याला निर्भेळ स्वरूप प्राप्‍त होत नाही, असे भावे मानीत होते. स्त्रीला शक्‍ती देणे या विचाराचे अस्तर भावे यांच्या सर्व ललित आणि वैचारिक लेखनाला आहे, असे वाटते ते त्यामुळेच.

लेखकाने मोठ्या चारित्र्याची माणसे निर्माण करावीत !
भारतावरील हिंदूंचे प्रभुत्व कमी किंवा नाहीसे झाले तरी चालेल; परंतु इस्लामला अप्रतिहत प्रतिष्ठा मिळवून देण्याचा विडा गांधी या व्यक्‍तीने आणि काँग्रेस या पक्षाने उचलल्यामुळे स्वतंत्र भारतातही मंदिर आणि महिला या दोन मानबिंदूंवर सतत तीक्ष्ण आघात होणार, हे ओळखून भावे यांनी मोठ्या युद्धाची व्यूहरचना करावी तसे आपले लिखाण निर्माण केले आहे. माणसाला देवत्वाची भूक असते, ती त्याची सार्वभौम आणि मूलभूत भूक असते. ती जर जागविली, तर माणूस क्षुद्र वर्तन करणार नाही, अशी ग्वाही भावे देतात. लेखकाने विकृत वासना चाळवू नयेत, तर मोठ्या चारित्र्याची माणसे उभी करावीत, असा आग्रह भावे धरतात. समाजात गटारे असतात आणि त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य लेखकाला आहे; पण गटारी साहित्याचा पंथ बनणार याची काळजी त्याने घेतली पाहिजे. त्यासाठी समाजात गंगा आहे, ती पवित्र आहे. जीवनदायिनी आहे, हे सांगत रहाणे हे लेखकाचे काम आहे, असे भावे टाहो फोडून सांगतात. तेव्हा फुटलेले धरण सांधण्यासाठी धौम्य साधूंचा शिष्य आरूणी आडवा पडला आहे, असा भास होतो.

स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा !
स्त्री जातीकडे जननी स्वरूपात पहा, असे भावे पोटतिडिकीने सांगतात. स्त्री ही सर्व अर्थाने सृजनशील आहे; म्हणून नवी सृष्टी निर्माण क्षमतेचा दावा जे करतात, त्या साहित्यिकांनी स्त्रीची महती गायली पाहिजे, असे उपदेशिणारे निबंधच्या निबंध भावे यांनी लिहिले आहेत. स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. एवढेच म्हणून भावे थांबत नाहीत, तर विविध प्रकारे स्त्रीची थोरवी ते समजावून सांगतात. स्त्री पुरुषाकडे केवळ पती म्हणून पहात नाही, तर मुलगा म्हणूनही पहाते, स्त्रीला केवळ पलंगप्रेम नको असते, तर तिला पाळण्यातले प्रेमही हवे असते, हे पुरुषांनी विशेषत: लेखकांनी विसरू नये, असे भावे आवर्जून लक्षात आणून देतात. जगात ठोकरा खाऊन आपण घरी परततो, तेव्हा आपली अत्यंत आतुरतेने वाट पहाणारे आपल्या आईचे, पत्‍नीचे डोळे उपस्थित असतात, हे आपले केवढे परमभाग्य आहे, हे भावे ध्यानात आणून देतात आणि त्याप्रती कृतज्ञ रहा, असे बजावतात.

स्त्रीचा मानभंग तिच्या जिव्हारी लागणे
`सहदेवा, थोडा अग्नि आण...' हा भावे यांनी ऐन पंचविशीत लिहिलेला आणि `रक्‍त आणि अश्रू'मध्ये समाविष्ट झालेला अजरामर लेख वाचला की, स्त्रीचा मानभंग त्यांच्या किती जिव्हारी लागतो, हे कळते. धर्मराजाच्या बुद्धीमांद्यामुळे आणि व्यसनाधीनतेमुळे द्रौपदी पणाला लागली, असे भावे सांगतात तेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन भावे यांना बरेच काही सांगायचे असते. इस्लामला भारतीय भावविश्‍वात हिंदु धर्माइतकीच प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा गांधींचा आग्रह म्हणजे न सुटणारे व्यसन आहे आणि त्यांचा इतिहासाचा अनभ्यास म्हणजे त्यांचे बुद्धीमांद्य आहे आणि त्यामुळे हिंदु स्त्रीचे कुलीनत्व टिकून रहाणे कठीण आहे, असे भविष्य भावे करतात. `बंगाल, एक करपून गेलेले कुसुम' या त्याच संग्रहातील १९३६ मध्ये लिहिलेल्या लेखात बलात्कारित हिंदु स्त्रियांच्या नेभळट, नपुंसक प्रतिक्रियांचा धिक्कार करून परिणामी पुढील दहा वर्षांत हिंदूंना मोजता येणार नाहीत इतके बलात्कार करण्याचा उन्माद जिहादी लोकांना चढेल, हे नमूद करून ठेवतात.

भावे म्हणतात `स्त्री कधी हीन नसते !'
राम गणेश गडकरी यांच्या सिंधु, लतिका, शिवांगी अशा सर्व नायिका भावे यांना अतिशय आवडतात. सिंधूची पतिपरायणता ही अंधश्रद्धा आहे, या टीकाकारांच्या मतांचा भावे खरपूस समाचार घेतात. गडकरी यांनी हीन पुरुष रंगवले; पण हीन स्त्री रंगविली नाही; कारण स्त्री हीन नसते, असे भावे सांगतात. त्या दृष्टीने या भावे जन्मशताब्दी वर्षात त्यांचे समग्र साहित्य सावकाशीने वाचले पाहिजे.