Advertisement

Monday, November 24, 2008

हिंदूंच्या संघटनातील सकारात्मक पाऊल !

न्यायालयाने दहशतवाद्याला दिलेली शिक्षा अमलात न आणणे ही काँग्रेसची सत्तांधता !

हिंदूंवरील आघात व हिंदूंची होणारी अवहेलना यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणी नेता किंवा संघटना पुढे आल्यास ती लक्ष वेधून घेणारी गोष्ट ठरते. हिंदूंचे हित जोपासण्यासाठी उदयास आलेल्या अनेक संघटना व पक्ष आहेत; परंतु त्यांचे कार्य प्रभावी ठरत नसल्यामुळे हिंदू एकाकी पडतात आणि राजकीय आधार तर त्यांना कधीच मिळत नाही. देशातील सर्वसाधारण परिस्थिती अशी असतांना अलीकडेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी केलेले एक वक्‍तव्य हिंदूंच्या आशा बळावण्याला मदत करू शकते.

संसदेवर हल्ला करणारा जर हिंदु असता, तर त्याला सरकारने कधीच फाशी दिले असते. संसदेवर हल्ला करणारा जर का नावाने आनंद मोहन अथवा आनंद सिंग असता, तर केंद्रातील काँग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या सरकारने त्याला ताबडतोब फासावर लटकवले असते. संसदेवर हल्ला करणारा महमद अफझल याला सरकारने का फाशी दिली नाही, त्याचे उत्तर केंद्र सरकारने अद्याप दिलेले नाही, असे श्री. अडवाणी यांनी पत्रकारांसमोर सांगितले. मध्यंतरी देशद्रोही अफझल याला न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही, या मुद्यावरून देशभर चर्चा होत होती. त्या वेळी अफझल याने म्हटले होते, ``देशाचा कारभार भाजपचे नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दिला, तर ते तो योग्यप्रकारे चालवतील व माझ्या फाशीच्या शिक्षेविषयीही निर्णय घेतील.'' खुद्द गुन्हेगारही काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे हे उदाहरण आहे. काँग्रेसचे सरकार केवळ राजकीय स्वार्थासाठी धर्मांध गुन्हेगाराला न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेली शिक्षा देत नाही, यासारखी मुजोरी दुसरी नसावी. श्री. अडवाणी यांनी केलेल्या या वक्‍तव्यातून देशद्रोह्यांना देशात थारा नाही, अशी भाजपची भूमिका आहे, असे जनता म्हणायला लागली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कारकीर्दीतही देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेसमोर आव्हाने होती. त्या वेळी दहशतवाद्यांना कंठस्नान घालायचे, हा त्यांचा निर्धारच होता. अक्षरधाम मंदिरावर हल्ले करणार्‍या दहशतवाद्यांना त्या वेळी ठार मारण्यात आले आणि संसदेवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले होते. संसदेवरील हल्ल्याच्या सूत्रधाराला मात्र काँग्रेसचा वरदहस्त मिळाला. भाजपच्या नेतृत्वाने दहशतवाद जसा निपटण्याचा प्रयत्‍न केला, तसा प्रयत्‍न काँग्रेस करत नाही; उलट दहशतवाद फोफावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार्‍या कृती केल्या जातात. भाजपच्या रालोआ सरकारने आणलेला पोटा कायदा काँग्रेसच्या सरकारने रद्दबातल ठरवला, हे त्याविषयीचे बोलके उदाहरण आहे. त्यानंतर देशात वाढत गेलेला दहशतवाद अद्याप थांबलेला नाही. विरोधी पक्षांचे नेते अद्यापही पोटा किंवा तत्सम कायदा नव्याने करण्याचे आवाहन सरकारला करत आहेत, तथापी काँग्रेसचे शासन तो करायला तयार नाही, यातच सर्वकाही आले. श्री. अडवाणी यांनी आरोप केल्याप्रमाणे देशात शेकडो दहशतवादी हल्ले झाले; परंतु त्यासंदर्भात कोणालाही अटक करण्यात आली नाही. काँग्रेसची ही नीती केवळ त्यांच्या सत्तांधतेचे प्रतीक आहे. आता तर काँग्रेसच्या शासनाने `हिंदु दहशतवाद' हे नवे पर्व सुरू केले आहे. मालेगाव बाँबस्फोट प्रकरण ही त्याची सुरुवात आहे, असे श्री. अडवाणी यांनी आवर्जून सांगितले.

हिंदूंचा आशावाद बळावला !
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग यांना दहशतवादविरोधी पथकाकडून मिळालेल्या अमानुष वागणुकीवर श्री. अडवाणी यांनी प्रकाश टाकला आहे.
श्री. अडवाणी या विषयावर मतप्रदर्शन करण्यासाठी का वेळ लावत आहेत, हा प्रश्‍न जनतेने काही दिवसांपूर्वी विचारला होता. आजचे श्री. अडवाणी यांचे विधान पहाता त्यामध्ये जनतेच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. `पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावू दे', या विचाराने श्री. अडवाणी स्तब्ध होते; परंतु पोलिसांकडून विशेषत: दहशतवादविरोधी पथकाकडून होणारे अत्याचार उघड झाल्यावर संसदेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी पंतप्रधानांना जाब विचारला. एका महिलेला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले, तिला अमानवी वागणूक दिली आणि तिची चौकशी करण्यासाठी महिला पोलीस अधिकार्‍याची नेमणूक केली नाही, या सगळया मुद्यांची उत्तरे त्यांनी पंतप्रधानांकडे मागितली. श्री. अडवाणी यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विषयीचे मुद्दे ज्या तडफेने पंतप्रधानांकडे मांडले, त्याला सगळया जनतेने दाद दिली आणि पंतप्रधानांना `साध्वीविषयींच्या सर्व आरोपांची चौकशी केली जाईल', असे आश्‍वासन द्यावे लागले. यापूर्वी साध्वींना पाठिंबा देण्यासाठी कित्येक हिंदुत्ववादी संघटना पुढे आलेल्या आहेत, १७ वकिलांचा एक गट त्यांना मदत करणार आहे आणि आता श्री. अडवाणी यांच्या हस्तक्षेपामुळे साध्वींचा मुद्दा राष्ट्रीय मुद्दा झाला. हिंदूंच्या संघटनातील हे एक सकारात्मक पाऊल आहे, हे निश्चित !

1 comment:

  1. Hinndunna, Aajun changle divas aahet manhje......

    ReplyDelete