Advertisement

Wednesday, November 12, 2008

बलदेव राज चोप्रा आणि `महाभारत' !

आपल्या निर्मितीतून हिंदु धर्म व संस्कृती यांचे खरे दर्शन घडवणार्‍या चोप्रांकडून अन्य निर्माते बोध घेतील का ?
चित्रपटसृष्टीबरोबर दूरदर्शनच्या इतिहासात `महाभारत' मालिकेतून क्रांती घडवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते बलदेव राज चोप्रा ऊर्फ बी.आर्. चोप्रा यांचे अलीकडेच वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय क्षेत्र ते चित्रपटसृष्टीपर्यंत अनेकांच्या मनात एक उत्कृष्ट दिग्दर्शक व निर्माता गमावल्याची भावना निर्माण झाली.
चोप्रा यांनी १९४९ सालापासून आपल्या चित्रपटनिर्मितीस प्रारंभ केला. `चित्रपटांनी चांगल्या कथानकांच्या माध्यमातून समाजातील परिस्थितीचे चित्रण केले पाहिजे', अशी त्यांची विचारधारा होती व त्याच विचारधारेतून त्यांनी आतापर्यंत वेगवेगळया विषयांवर चित्रपटनिर्मिती करून आपली छाप पाडली होती. चांगल्या कथानकाशिवाय चित्रपट बनवायचा नाही आणि कथानक भावलेच, तर चित्रपटाला किती खर्च येईल, याचा विचार करायचा नाही, हे त्यांचे धोरण होते.

`महाभारत' मालिकेतून हिंदूंच्या हृदयात कायमचे स्थान मिळवणे
चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांनी `महाभारत' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली. छोट्या पडद्यावर रामानंद सागर यांची `रामायण' ही मालिका गाजल्यानंतर त्यापाठोपाठ चोप्रा यांनी १९८५ साली छोट्या पडद्यावरून `महाभारत'चे यथार्थ दर्शन घडवले. त्यांची ही कलाकृती लोकांच्या कायम स्मरणात राहिली व या मालिकेच्या माध्यमातून चोप्रा यांनी जनतेच्या विशेषत: हिंदूंच्या मनात आपले कायमचे स्थान निर्माण केले. `महाभारत' या मालिकेने लोकांना अक्षरश: वेड लावले. आपले सर्व दैनंदिन व्यवहार थांबवून लोक ही मालिका दर रविवारी दूरदर्शनवर न चुकता पहात असत. बहुतांश हिंदूंना महाभारत या महान ग्रंथाबाबत काही अंशी माहिती असेल; मात्र चोप्रा यांनी या मालिकेतून संपूर्ण `महाभारता'बरोबरच हिंदु धर्म व संस्कृती यांचे खरे दर्शन घडवले. अशा या निर्मात्याला त्याच्या निधनानिमित्त आदरांजली वाहातांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी `दूरदर्शनच्या इतिहासात महाभारत मालिकेतून क्रांती घडवणारे बी.आर्. चोप्रा' अशा शब्दांत गौरवोद्‌गार काढले, तर `भारताने एक सुसंस्कृत आणि भारतीय संस्कृती जपणारा निर्माता, दिग्दर्शक गमावला', अशी प्रतिक्रिया व्यक्‍त करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांनी चोप्रा यांना आदरांजली वाहिली. केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने विडंबनात्मक नाटके काढून महाभारतातील श्रद्धास्थानांचे व देवतांचे विडंबन करणार्‍या गल्लाभरू धर्मद्रोही नाट्यनिर्मात्यांनी चोप्रा यांनी केलेल्या निर्मितीतून काही बोध घेतल्यास त्यांनाही खर्‍या कलेची ओळख होईल.

No comments:

Post a Comment