देशात अराजक निर्माण होईल अशी वक्तव्ये करणार्या मुसलमान नेत्यांबाबत काँग्रेस गप्प का ?
मालेगावमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणाखाली अटकेत असलेल्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना पाठिंबा देणार्या शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री. गुरुदास कामत यांनी केली. त्यांच्या या मागणीचा श्री. ठाकरे यांनी `दैनिक सामना'मध्ये पुरेपूर समाचार घेतला आहे. येथे अभ्यास करण्यासारखा मुद्दा म्हणजे मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदू आरोपींना पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना पुढे सरसावल्यावर तथाकथित निधर्मीवाले, डावे व काँग्रेसवाले यांनी कावकाव करायला सुरुवात केली. श्री. कामत यांनी आजूबाजूला नजर फिरवली, तर त्यांना अनेक देशद्रोही दिसतील. या देशद्रोह्यांना अटक करण्यासाठी आवाज उठवण्याची हिंमत श्री. कामत व त्यांच्या काँग्रेस सरकारमध्ये आहे का ? १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांचा प्रमुख सूत्रधार दाऊद इब्राहिम व अबु आझमी यांचे सलोख्याचे संबंध आहेत, हे सर्वश्रुत आहेच. याच अबु आझमी यांनी `मुसलमानांवर अत्याचार होत असून तो थांबवला नाही, तर ते हिंसक बनतील व हिंदुस्थानाला कोणीही वाचवू शकणार नाही', असे वक्तव्य केले. `मुसलमान देशात अराजक माजवतील', असा इशाराही त्यांनी दिला. हे अबु आझमी अधूनमधून देशविघातक वक्तव्ये करत असतात. अशा वेळी त्यांना अटक करण्याची धडक कृती तर सोडाच, तशा आशयाची मागणी करण्याचीही हिंमत श्री. कामत व त्यांचे काँग्रेस बंधू का दाखवत नाहीत ?
जिहादी दहशतवाद्यांना पाठिंबा म्हणजे निधर्मीवाद व हिंदू आरोपींना पाठिंबा म्हणजे धर्मांधपणा !
दिल्ली बाँबस्फोटांच्या प्रकरणात अटकेत असलेले दहशतवादी हे जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापिठामध्ये शिकत होते. त्यांना वकील देणार असल्याचे विद्यापिठाने जाहीर केल्यावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. अर्जुन सिंग यांनी त्याला पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या दृष्टीने जिहादी दहशतवाद्यांना पाठिंबा दिला, तर तो निधर्मीवाद व बाँबस्फोटाच्या प्रकरणात अडकलेल्या हिंदू आरोपींना पाठिंबा दिला, तर तो धर्मांधपणा होतो ! आतापर्यंत दिल्ली व अहमदाबाद येथे झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात अटकेत असलेल्या जिहादी दहशतवाद्यांच्या किती वेळा नार्को व इतर चाचण्या करण्यात आल्या ? मात्र मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या हिंदू आरोपींची वारंवार चाचणी करण्यात येत आहे. काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांसाठी एक न्याय असतो व हिंदूंसाठी एक न्याय असतो, हेच यातून दिसून येते.
अफझल याला फाशी देऊन मर्दुमकी दाखवा !
मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर अटकेत आहेत. त्यांच्यावरील आरोप अद्यापही सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना पाठिंबा दिल्यावर काँग्रेसवाल्यांचे पित्त खवळते. हेच काँग्रेसवाले संसदेवर हल्ला करणारा महंमद अफझल याला फाशी देण्यासाठी टाळाटाळ का करतात ? `अहमदाबादमधील बाँबस्फोटांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला जिहादी दहशतवादी अबु बशीर याची सुटका केली नाही, तर १९४७ साली झालेल्या घातपातापेक्षा मोठा घातपात भारतात घडवून आणू', असे वक्तव्य जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी केले होते. पाकिस्ताननिष्ठ बुखारी नेहमीच भारताच्या नाकावार टिच्चून देशविघातक वक्तव्ये करतात. त्यांच्याकडे काँग्रेसवाले कानाडोळा का करतात ? काँग्रेसवाल्यांना हिंमत असेल, तर त्यांनी अशांना पकडून त्यांची मर्दुमकी दाखवावी !
...तर काँग्रेसला तोंड लपवायला जागा उरणार नाही !
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी `मालेगाव बाँबस्फोटाचा तपास पूर्ण झाल्यानंतर अनेकांना तोंड लपवून फिरावे लागेल', असे वक्तव्य केले होते. सध्याची परिस्थिती पहाता हिंदुसंघटनाच्या दृष्टीने मालेगाव बाँबस्फोटाचे प्रकरण हे ऐतिहासिक ठरणार, असे चित्र आहे. मालेगावमध्ये बाँबस्फोट कोणी केले, हे आता न्यायालय ठरवेल; मात्र या घटनेवरून हिंदूंमधील काँग्रेसबद्दल वाढत चाललेला असंतोष बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे, हे निश्चित ! त्यामुळे या प्रकरणानंतर हिंदुत्ववाद्यांना नव्हे, तर काँग्रेसवाल्यांना तोंड लपवायला जागा उरणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
Showing posts with label congress. Show all posts
Showing posts with label congress. Show all posts
Tuesday, November 11, 2008
Subscribe to:
Posts (Atom)