Saturday, January 8, 2011

काँगे्रस शासन जाणीवपूर्वक हिंदुत्ववाद्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवत आहे - रा.स्व. संघ

स्वामी असीमानंद यांनी समझौता एक्स्प्रेस स्फोटातील सहभागाची कबुली दिल्याचा प्रसारमाध्यमांचा दावा
नवी दिल्ली, ७ जानेवारी (वृत्तसस्था) - स्वामी असीमानंद यांनी फेब्रुवारी २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधील बाँबस्फोटात त्यांचा सहभाग असल्याचे मान्य केल्याचे वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना संघाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले, ‘‘केंद्रशासन खूप पूर्वीपासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये जाणीवपूर्वक अडकवत आहे.’’
(केंद्रातील काँग्रेसचे राज्यकर्ते आयएस्आयच्या हस्तकाप्रमाणे कार्य करत आहेत. ते हिंदुत्ववादी संघटनांना जाणीवपूर्वक आतंकवादी ठरवत आहेत, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिक जाणून आहे, तेच सत्य पुन्हा सांगून राम माधव काय साध्य करू इच्छित आहेत ? राम माधव यांनी केवळ लोकांना माहिती असणार्‍या गोष्टीच पुन्हा सांगत बसण्याऐवजी राज्यकर्त्यांना जरब बसून ते हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार नाहीत, अशी कृती करणे हिंदूंना अपेक्षित आहे. संघाचे नेतृत्व हिंदूंच्या भावना समजून त्याप्रमाणे कृती करणार का ? - संपादक)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार असीमानंद यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांसमोर समझौता एक्स्प्रेस स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांचा हात आहे, असे मान्य केले आहे. (काँग्रेसचे राज्यकर्ते केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विकाऊ प्रसारमाध्यमे यांना हाताशी धरून िंहदुत्ववादी संघटना आणि नेते यांना संपवण्यासाठी किती नियोजनबद्धरीत्या त्यांची मानहानी करत आहेत, त्याचेच हे एक उदाहरण आहे. हिंदू संघटित नसल्यानेच काँग्रेसचे राज्यकर्ते असे साहस करू धजावत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी त्यांचे व्यापक संघटन निर्माण करून राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांच्या हातात सत्ता सोपवायला हवी ! - संपादक)
स्वामी असीमानंद यांनी मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या स्फोटांत संघाचे नेते इंद्रेशकुमार यांच्या कथित संबंधांविषयीही माहिती दिली आहे. तसेच साध्वी प्रज्ञा सिंग, सुनील जोशी, इंद्रेशकुमार आणि इतर यांनी देशभर आतंकवादी आक्रमणे करण्याचा कट रचला होता, याचीही माहिती दिली आहे, असे प्रसारमाध्यमांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. (एखाद्या खटल्याचे कामकाज चालू असतांना त्याविषयीची अशी माहिती प्रसारमाध्यमांकडून कोणताही अधिकृत हवाला न देता प्रसारित केली जाते, हा हिंदुत्ववादी संघटनांच्या मानहानीच्या व्यापक कटाचाच भाग आहे, असेच म्हणावे लागेल. या प्रसारमाध्यमांनी कधीच जिहादी संघटनांच्या संदर्भात असे वृत्त दिलेले नाही. हिंदूंची अशी जाणीवपूर्वक मानहानी करणार्‍या प्रसारमाध्यमांना धडा शिकवण्यासाठी हिंदूंची त्यांच्यावर बहिष्कार घालायला हवा ! - संपादक)

0 comments:

Post a Comment